Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

SANSKRITISANSKRITI DHARA

amygdala hijack – संस्कृत – साहित्यरंग आणि आपण – 1

1 Mins read

amygdala hijack – संस्कृत – साहित्यरंग आणि आपण – 1

amygdala hijack – संस्कृत – साहित्यरंग आणि आपण – 1

 

 

मित्रांनो,
भारतीय संस्कृतीचे अनेकविध पैलू ज्या भाषेमुळे दृग्गोचर होतात अशी भाषा म्हणजे संस्कृत. संस्कृत भाषेत अफाट साहित्य लिहिलं गेलं आहे.

या भाषेतली काव्य – नाटकं आजही वाचकाला खूप आनंद देऊन जातात, अनेक गोष्टी शिकवून जातात. आपल्या समाजात रुजलेल्या, रुळलेल्या कितीतरी गोष्टी – विश्वास,

समजूती संस्कृतमधून आपल्यापर्यंत आल्या आहेत. आजच्या काळात हे साहित्य वाचताना, आपल्याला काय प्रतीत होतं, काय आठवतं, काय सुचतं..याचा आढावा

पोस्टबॉक्स – संस्कृता च्या माध्यमातून घेत आहोत. भूतकाळाचे धागेदोरे वर्तमानाशी कसे जोडले आहेत, हे पाहाणं नक्कीच मनोरंजक ठरेल.

भारतीय संस्कृतीच्या शिकवणुकीचा विचार करता, क्रोध किंवा राग हा माणसाच्या एकंदर विकासाला बाधक ठरणाऱ्या षडरिपूपैकी एक दुर्गुण होय . एखाद्या गोष्टीबद्दल किंवा

व्यक्तीबद्दल असणारी आत्यंतिक नावड किंवा विरोधी भावना एखाद्या व्यक्तीबद्दलच्या किंवा विशिष्ट गोष्टीबद्दलच्या रागात परिणत होत असते, असं शब्दकोश सांगतात. धर्मशास्त्राच्या

नियमांनुसार क्रोध किंवा राग, कोप हा दुर्गुण होता होईल तो, माणसाच्या अंगी नसावाच, कारण या भावनेच्या आहारी गेल्याने माणसाचा स्वतःवरचा ताबा सुटतो, योग्य काय

अयोग्य काय याचे तारतम्य तो हरवून बसतो आणि त्या भरात त्याच्या हातून कोणत्याही वेड्यावाकड्या गोष्टी घडू शकतात. असा कोपिष्ट मनुष्य चांगला नागरिक बनू शकत नाही

किंवा या दुर्गुणामुळे त्याच्या वैयक्तिक आयुष्यावरही निरनिराळे भावनिक-मानसिक परिणाम होताना दिसतात. त्याच्या कुटुंबियांचे आयुष्य सुद्धा या त्याच्या तीव्र रागाच्या

सततच्या सावटाखालीच जात असते. म्हणजेच एका माणसाच्या रागाचे परिणाम वैयक्तिक तसेच सामाजिकपातळीवरही वेगवेगळ्या प्रकाराने दिसून येत असतात. भगवद्गीतेत सुद्धा

रागाच्या भरात माणूस कसा बेताल होतो आणि पुढे त्याचे कसे नुकसान होत जाते, याचे वर्णन केले आहे – क्रोधात् भवति संमोहः संमोहात् स्मृतिविभ्रमः ||

माणसाच्या मनात मुळातच असणाऱ्या , प्रसंगोपात्त येणाऱ्या मूळ भावानांपैकी एक भावना म्हणजे राग किंवा क्रोध. संस्कृत साहित्यातून या रागाच्या भावनेचे आणि त्याच्या

अभिव्यक्तीचे वर्णन अनेकदा आले आहे. ऋग्वेदात तर मन्यु म्हणजे क्रोध, उत्साह, स्फूर्ती यांची अधिष्ठात्री देवता असे मानून तिची स्तुती करणारी सूक्ते देखील रचलेली दिसून येतात.

(मन्युसूक्ते – ऋ. १०.८३,८४) या जगात कोणतेही काम करण्यासाठी स्फूर्ती असावी लागते, उत्साह असावा लागतो. मुळात उत्साह नसेल तर कोणतेच काम होऊ शकत नाही. मात्र,

उत्साह किंवा जोश हे अनुकूल परिणाम निर्माण करणारे मनोव्यापार होत, तर राग, क्रोध हा सगळ्या इतर मनोव्यापारांना झाकोळून टाकणारा, माणसाची सकारात्मक शक्ती नाहीशी

करणारा असा दुर्गुण आहे. या अशा क्रोधभावनेचे प्रत्ययकारी चित्रण आपल्याला, संस्कृत भाषेतील अभिजात वाङमायाला ललामभूत ठरलेल्या, पंचमहाकाव्यात गणले जाणारे काव्य,

माघकवी लिखित शिशुपालवध नावाच्या काव्यात आढळून येते. कालिदासाचे उपमा दर्शविण्याचे अन्योन्य कसब, भारवीची थोडक्या शब्दात मोठा आशय गुंफण्याची हातोटी,

आणि दंडी कवीची श्रुती- अर्थमनोहारी असणारी सुबकपणे गुंफलेली रचना हे सर्व एकत्रितपणे माघाच्या रचनांत पाहायला मिळते असे म्हटले जाते – माघे सन्ति त्रयो गुणाः |.

इतकेच नव्हे, तर, हे सर्व गुण माघाच्या लिखाणात असल्याने माघाच्या एकाच काव्याचा अभ्यास करताना अभ्यासक-रसिकाचे संपूर्ण आयुष्य व्यतीत होते,

असेही सांगितले जाते. माघाचे शिशुपालवध हे महाकाव्य महाभारतातील सभापर्व आणि श्रीमद्भागवतातील दशम स्कंधावर आधारित असणारे काव्य आहे.

महाभारतात श्रीकृष्ण व शिशुपाल यांची गोष्ट प्रसिद्ध आहे. शिशुपाल म्हणजे श्रीकृष्णाच्या आत्याचा मुलगा. रुक्मिणीचा भाऊ रुक्म याचा सख्खा मित्र असणारा

शिशुपाल रुक्मिणीशी विवाह करण्याची इच्छा मनाशी बाळगून होता. मात्र श्रीकृष्णाने रुक्मिणीला तिच्या स्वयंवराच्या वेळी जाऊन पळवून नेले, त्यामुळे

शिशुपालाची घोर निराशा झाली. तेव्हापासून तो श्रीकृष्णावर चिडला, त्याला अगदी पाण्यात पाहू लागला. त्यामुळेच, श्रीकृष्ण – शिशुपालाची कथा म्हणजे अनेक

स्पर्धा,ईर्ष्या,मत्सर अशा भावभावनांची सरमिसळ. श्रीकृष्णाच्या क्षमाशीलतेचे तसेच त्याच्या युगन्धरत्वाची प्रचीती देणारी ही गोष्ट. श्रीकृष्णाचे पांडवांसोबत गहिरे नाते होते, हे

तर सर्वांनाच माहित आहे. शिशुपाल अर्थात त्यांच्या विरोधी गटात होता, म्हणजे कौरवांच्या बाजूचा होता. त्यामुळे या कथेला निरनिराळे असे सामाजिक- राजकीय पदर

सुद्धा आहेत. मूळ महाभारतातील अनेक कथा-उपकथांच्या संभारातली एक अशी ही कथा या महाकाव्यात अगदी रंगवून सांगितली आहे. हे महाकाव्य वाचताना

– अभ्यासताना मानवी स्वभावातील क्रोधाचे अनेक कंगोरे लक्षात येत रहातात.

१. यादवांना पांडवांकडचे आग्रहाचे असे यज्ञाचे निमंत्रण आले आहे. पण नेमके याच वेळी शिशुपालाचा खोडसाळपणा देखील समोर आला आहे. श्रीकृष्णाशी असणारे त्याचे

स्वघोषित वैर प्रसिद्धच होते.त्यामुळे स्वतः श्रीकृष्णांनी आपल्या भावाकडे बलरामाकडे व अंतरंग भावसुहृदाकडे म्हणजेच उद्धवांकडे ही समस्या विचारमंथनासाठी मांडली .

त्यांचे याबाबतीतले मत काय आहे याचा अदमास घेतला. amygdala hijack शिशुपालाचे अपराध पाहता या प्रसंगी त्याच्यावर चढाई करणेच योग्य असल्याचे मत बलरामांनी सांगितले.

त्याच्या व श्रीकृष्णाच्या वैराला श्रीकृष्णांनी केलेले रुक्मिणीहरण हे मूळ कारण असल्याची ते आठवण करून दिली. श्रीकृष्ण नरकासुराचा वध करण्यासाठी गेले असताना शिशुपालानेने द्वारकेला

वेढा घातला, इतकेच नव्हे तर त्या प्रसंगी अनेक यादव स्त्रियांचे अपहरण केले.त्यामुळे वस्तुतः तो श्रीकृष्णाचा नातेवाईक असला तरी क्षमेस पात्र नाही असे मत बलरामाने अत्यंत

ठाशीवपणे मांडले. एखाद्या व्यक्तीने गवताच्या गंजीत जळती काडी टाकली आणि पुन्हा स्वतः त्या गंजीजवळ हवेच्या दिशेने तोंड करून झोपला तर परिणाम काय होतो..अर्थातच

गवत पेटते, आगीचा लोळ हवेच्या दिशेने त्या व्यक्तीपर्यंत येतो आणि ती झोपलेली व्यक्ती संकटात पडते – हे मार्मिक उदाहरण देऊन बलराम सांगतात की श्रीकृष्णाने शिशुपालाला

विरोध करून त्याला असेच दुर्लक्ष करत सोडून देऊ नये. त्याच्यासारख्या स्वभावतः खलअसणाऱ्या व्यक्तीचा सारा विरोध श्रीकृष्णावर कोणत्याही वेळी अवचितपणे आदळू शकतो.

विधाय वैरं सामर्षे नरोSरो य उदासते| प्रक्षिप्योदर्चिषं कक्षे शेरते तेSभिमारुतम् || (२.४२) वाटेवरची धूळ सुद्धा पायांनी तुडवली असताना डोक्यावर चढून बसते म्हणूनच ती धूळ

सुद्धा अपमानित होऊन देखील शांत राहणाऱ्या शांतीप्रिय माणसापेक्षा भलीच म्हणावी – पदाहतं यदुत्थाय मूर्धानमधिरोहति | स्वस्थादेवापमानेऽपि देहिनस्तद्वरं रजः || (२.४६)

मवाळ,सौम्य माणसाला या जगात नेहेमीच त्रास सहन करावा लागतो, हे पुन्हा बजावून सांगताना बलराम श्रीकृष्णाला सूर्य व चंद्र ग्रहणाचे उदाहरण देतात. सूर्याला आणि चंद्राला

ग्रासणारा ग्रह एकच आहे – राहू. पण हाच राहू सूर्याला सहजासहजी ग्रासू शकत नाही, उलट चंद्राला ग्रासायला त्याला फार वेळ लागत नाही. (२.४९) बलरामाच्या या जोशपूर्ण

भाषणातून वाईट, दुष्ट प्रवृत्तीबद्दलचा त्याचा राग तसेच व्यवहारात जशास तसे कसे वागावे, का वागावे याबद्दलचा त्याचा दृष्टीकोन कळून येतो. तसेच शिशुपालाने श्रीकृष्णाप्रती

बाळगलेल्या अकारण वैराबद्दलचा त्याला आलेला सात्विक संतापही समजतो. २. या महाकाव्यात युधिष्ठिराने श्रीकृष्णाला दिलेल्या अग्रपूजेच्या मानामुळे सहन न

झाल्यामुळे शिशुपालाने ऐन यज्ञस्थळी केलेला क्रोधमत्सरयुक्त तडफडाट आढळून येतो. amygdala hijack श्रीकृष्णाला मिळालेल्या आदरसत्कारामुळे शिशुपालाला इतका राग आला की त्याच्या

डोळ्यांतून रागाचे अश्रू वाहू लागले. मनात न मावणाऱ्या क्रोधाच्या उष्णतेमुळे त्याच्या कपाळावर, बाहूंवर घामाचे थेंब जमा झाले (शिशु.१५.४ ). भावनावेग सहन न होऊन त्याचे

सर्व शरीरच कापू लागले, भिवया वक्र झाल्या , डोळे लालेलाल झाले. मनात वाढत चाललेल्या रागाचा निचरा करण्यासाठी त्याने सभेतील एका खांबाला धक्का दिला,

जवळच असणारी एक तलवार उचलली, एका हाताने आपल्या जांघेवर प्रहार करू लागला. यानंतर त्याने श्रीकृष्णाची अग्रपूजेसाठी निवड केली याबद्दल युधिष्ठिराला दूषणे दिली. तो म्हणाला,

‘सभेत अनेक गुणवान राजे असताना श्रीकृष्णाचा मान करणे म्हणजे अग्नी प्रज्वलित असताना सुद्धा कुत्र्याला हव्यन्न खाऊ घालण्याजोगे आहे – ग्राम्यमृग इव हविस्तदयं भजते

ज्वलत्सु न महीशवह्निषु ||’ (शिशु.१५.१५) कृष्णासारख्या निन्दनीय, अपूजनीय व्यक्तीची पूजा करून युधिष्ठिराने आपलेही खोटारडेपण दाखवून दिले असेही शिशुपाल म्हणतो. ‘या

यज्ञात श्रीकृष्णाचीच पूजा करायची होती तर इतर सर्व महानुभाव राजांना निमंत्रण तरी का दिलेत?’असा बोचरा प्रश्नही त्याने विचारला.यानंतर त्याने भीष्म पितामहांवरदेखील टीकेची

झोड उठविली. इतकेच नव्हे तर श्रीकृष्णाच्या अनेक पराक्रमी कृत्यांमधली एक वेगळी बाजू दाखवून श्रीकृष्ण हा वस्तुतः कसा असत्याचारी,अन्यायी, कपटी आहे असे दाखविण्याचा

प्रयत्न केला. इतकेच नव्हे, तर कृष्णाचे बळ म्हणजे वस्तुतः बलरामाचे बळ असून स्वतः कृष्ण सर्वस्वी बलहीन आहे, अशी खरमरीत टीका केली. श्रीकृष्णाला चक्रधर,इष्टसत्य,श्रीपती,

विक्रमी अशा अनेक नावांनी ओळखले जाते. ही नावे खरे तर त्याला साजेशी नसून या नावांतून श्रीकृष्णाचे सामान्यत्वच प्रकट होते, त्याच्या व्यक्तीमत्त्वाचे एक-एक कमकुवत

पैलूच यातून उघड होतात, असा दावा देखील केला. (शिशु.१५. २५ – ३२) ‘त्वयि पूजनं जगति जाल्म कृतमिदमपाकृते गुणैः | हासकरमघटते नितरां शिरसीव कङ्कतमपेतमूर्धजे ||’
(१५.३३)

3. शिशुपालाचे द्वेषपूर्ण भाषण ऐकून भीष्मपितामह उभे राहिले आणि गर्जून म्हणाले, ‘या सभेत माझ्याकडून कृष्णाचा केला गेलेला सत्कार ज्यांना मान्य नाही, त्या व्यक्तीने युद्धासाठी

धनुष्यावर प्रत्यंचा चढवावी. अशा सर्वांच्या मस्तकावर पाय रोवून हा मी उभा आहे ’. ४. भीष्मांनी केलेला हा अधिक्षेप ऐकून सभेत उपस्थित असणारे शिशुपालाची बाजू न्याय्य

आहे असे वाटणारे अनेक राजे संतप्त झाले. कोणी रागाने लालेलाल झाले, कोणाचा चेहेरा रागाने विकृत झाला, तर कोणी भीष्मांचे हे उघड आव्हान ऐकून अट्टाहास करू लागला.

रुक्मी सारखा राजा तर आधीपासूनच श्रीकृष्णावर संतप्त होता, त्याच्या संतापाला खतपाणी मिळाले. तर अन्य कोणा राजाला आता युद्ध अटळ आहे, या विचाराने अतीव समाधान

झाले. शिवाय, या सर्व राजांनी यज्ञसभेचा तात्काळ त्याग केला. amygdala hijack माघाने रंगविलेल्या क्रोधाच्या या छटा वाचकाला काहीतरी शिकवून जाणाऱ्या आहेत:-

1. शिशुपालाच्या क्रोधाच्या अभिव्यक्तीतून एखाद्या गोष्टीबद्दलचा / व्यक्तीबद्दलचा मुरलेला राग कसा द्वेषात रुपांतरीत होतो, हे कळून येते. अशा रागात माणसे कशी

योग्यायोग्याचा विवेक हरवून बसतात, स्थळ- काळ- परिस्थिती ची बंधने जुमानेनाशी होतात, हे उमजते. पांडवांच्या घरी पवित्र अशा यज्ञासाठी निमंत्रित म्हणून येऊन सुद्धा

शिशुपाल यजमानाला म्हणजे युधिष्ठिराला नावं ठेवतो आहे, त्याने निवडलेल्या पूजनीय व्यक्तीबद्दल म्हणजे कृष्णाबद्दल निरर्गल बोलतो आहे, भर सभेत कुरुकुलातील ज्येष्ठ आणि

श्रेष्ठ मंडळींवर टीका करतो आहे. जे काही वागतो आहे त्यातून त्याच्या मनातल्या क्रोधाच्या धगीचा आपण अंदाज बांधू शकतो. पण म्हणून त्याचे वागणे अजिबात

समर्थनीय होत नाही, उलट माणसाने आपल्या रागावर नियंत्रण का मिळवायला हवे याचे उदाहरण जणू तो घालून देतो आहे.

2. बलरामाचा दृष्टीकोन म्हणजे एका रोखठोक व्यक्तीचा व्यावहारिक दृष्टीकोन आहे. आपल्याला कोणी त्रास देत असेल, कारण नसताना आपल्या मार्गात आडवे येत असेल,

सतत आपले वाईट चिंतत असेल तर अशा माणसासोबत वागताना, बोलताना आपल्याला त्या प्रतिकूल भावनेचे जणू तरंग जाणवत राहतात. अशा वेळी पुन्हा संबंध

सुधारतील अशी आशा बाळगणे निव्वळ व्यर्थच होय. हे एकदाच मान्य करून टाकावे आणि या प्रश्नावर थेट कृतीतून-“ठकासी व्हावे महाठक , खटासी व्हावे खटनट”- अशा

पद्धतीने उत्तर शोधावे, असा हा विचार आहे. 3. भीष्मांची प्रतिक्रिया म्हणजे ध्येयनिष्ठ माणसाच्या मूल्यांवर, आदरस्थानांवर आघात

झाल्यावर त्याच्या मनातून उठलेली क्रोधाची धगधगती ज्वाला ! मात्र बरेचदा अशा सात्त्विक मंडळींकडून योग्य काय अयोग्य काय याच्या कात्रीत सापडल्याने,

कोणतीही प्रत्यक्ष कृती घडून येताना दिसत नाही, तरीही अशा वयोवृद्ध व्यक्तींचे रागाचे बोलणे आपल्या चुका समजून घेण्यासाठी, योग्य-अयोग्याचे भान येण्यासाठी गरजेचे असते.

4. तर, शिशुपालाच्या पाठीराख्या राजांच्या प्रतिक्रिया म्हणजे अनुयायी मंडळींची हुल्लडबाजी. समोरच्या व्यक्तीला बावचळून टाकणाऱ्या, प्रसंगी घाबरवणाऱ्या ,

गोंधळवणाऱ्या आक्रमक प्रतिक्रिया! या अशा अकारण आक्रमक प्रतिक्रियांतून समूहाची गतानुगतिक मानसप्रक्रिया अतिशय चांगल्या पद्धतीनी कळते.

या सगळ्या प्रसंगातून राग – क्रोध या एकाच भावनेच्या अनेक पैलूंचे दर्शन आपल्याला घडते. एका घटनेकडे निरनिराळ्या प्रवृत्तीच्या व्यक्ती कसे पाहतात, त्यांच्या भावनिक-

मानसिक – वाचिक- शारीरिक प्रतिक्रिया कशा असतात, हे कळते. यातूनच त्यांच्या सूक्ष्म मनोव्यापारांचा अंदाज येतो. या संपूर्ण वर्णनावरून माणसा-माणसातील संबंध

कसे असावेत, ते किती ताणावेत, amygdala hijack राग-द्वेष यांच्या आहारी जाऊन स्वतःचे व आपल्या जवळच्या व्यक्तींचे कायमचे नुकसान कसे करू नये हे देखील कळते.

माघाच्या महाकाव्यातील हा प्रसंग वाचत असताना,एक तटस्थ वाचक म्हणून आपल्याला आश्चर्य वाटत राहतं की शिशुपाल देखील एक राजा होता, राज्यकारभार

करत असताना त्याला अनेकदा आव्हानात्मक समस्यांचा सामना करायला लागला असणार, अशा प्रश्नांवर त्याने उत्तरेही शोधली असतील तरीदेखील, त्याच्यासारख्या

अनुभवी प्रशासकाची प्रतिक्रिया इतकी टोकाची किंवा आक्रस्ताळी कशी काय होती? किंवा, त्याचे अनुयायी देखील जे वेगवेगळ्या राज्यांचे अधिपती होते, ते देखील अशा

प्रकारे कसे काय वागले? या प्रश्नाला अर्थातच एक राजकीय पैलू आहे आणि तेच या प्रश्नाचं वास्तविक उत्तर आहे. शिशुपालाचा घायाळ अहंकार, आपला मोठेपणा सिद्ध

करायची त्याची धडपड, त्यात कौरव-पांडवांच्या वैराची कौटुंबिक स्पर्धेची मिळालेली जोड अशा तीन कोनांभोवती त्याचं वागणं फिरताना दिसतं. म्हणजे शिशुपालाच्या

वैयक्तिक दुर्गुणांना तत्कालीन राजकीय परिस्थितीची पूरक चौकट मिळाली आणि हा असा प्रसंग घडून आला,असं म्हणायला हरकत नाही.

 

 

Also Visit : https ://www.postboxlive.com

 

वर्तणूक- शास्त्राच्या अभ्यासानुसार या अशा आक्रस्ताळ्या,कांगावखोर प्रतिक्रियांना ‘अमिग्देला हायजॅक’ (amygdala hijack) असे म्हटले जाते. या वैयक्तिक पातळीवरच्या

आत्यंतिक भावनिक स्वरूपाच्या प्रतिक्रिया असतात. यांत खरं तर भावनिक उद्रेकाचं कारण किंवा स्रोत मुळात अगदी साधा, क्षुल्लक असतो मात्र त्याला उत्तर म्हणून दिली

जाणारी प्रतिक्रिया अत्यंत तीव्र स्वरूपाची असते. मेंदूत घडून येणाऱ्या काही गुंतागुंतीच्या प्रक्रियांमुळे असे मानसिक- भावनिक उद्रेक घडून येतात, असे अभ्यासकांनी

सिद्ध केले आहे. व्यवहारात अनेकदा आपण असे प्रसंग बघतो, ऐकतो किंवा अनुभवतो देखील. क्वचित तर आपणही अशा टोकाच्या प्रतिक्रिया दिलेल्या असतात. काही

काळानंतर आपल्यालाच आश्चर्य वाटत राहते, की आपण असे कसे वाहवत गेलो ? असं कसं वागलो ? आपल्या आई-आजी आपल्या लहानपणी नेहेमी सांगत असत,

एखाद्या गोष्टीचा राग आला, एखादी गोष्ट पटली नाही तर एकदम व्यक्त व्हायचं नाही, जरा थांबायचं, दहा आकडे मोजायचे आणि मग बोलायचं. आधुनिक शास्त्रानुसार देखील

‘अमिग्देला हायजॅक’ हा खरेच काही पळांचा असतो.

भावनांची एक तीव्र लाट आपल्या मनावर आदळते.पण,ती सहन करायची. थांबायचे. त्यानंतर जेव्हा आपण बोलायला सुरवात करतो तेव्हा आपल्याला आपल्या

भावनांचा झंझावात लक्षात आलेला असतो. त्यांचा कार्य-कारणभाव कळलेला असतो. अशा वेळी तर्क कोणता आणि कुतर्क कोणता हे

आपल्याला सहज लक्षात येते, मग, आपला आवाज स्थिर होतो, आणि..आपण शांतपणे आपले मुद्दे मांडायला लागतो. amygdala hijack म्हणजे खरं तर रागाच्या ठिणगीचे विवेकात रूपांतर

होण्याचे अंतर काही क्षणांचे असते. तेवढं शिशुपालाच्या बाबतीत सुद्धा असे होऊ शकले असते..जर, त्याचा विवेक ताळ्यावर असता तर !

क्रोध- द्वेष या भावनांनी त्याचा कब्जा घेतला नसता, त्याचा तोल असा ढासळला नसता तर तो स्वतः भर सभेत असे आक्रस्ताळे वागला नसता, तर, त्याच्या

वागणुकीने चिथावणी न मिळाल्याने त्याचे अनुयायीही गप्प बसले असते, भीष्मांना भर सभेत इशारा देण्याची गरज निर्माण झाली नसती. आणि, अर्थातच पुढे त्याला स्वतःचा

जीव गमवावा लागला नसता. या सगळ्या प्रसंगात ज्याच्यावर अत्यंत जहरी भाषेत टीका होत होती तो श्रीकृष्ण अतिशय शांतपणे वावरत होता, हे लक्षात घेतले पाहिजे. जेव्हा सगळ्या गोष्टी

मर्यादेच्या बाहेर गेल्या तेव्हा मात्र त्याने निर्वाणीचे आणि निर्णायक पाऊल उचलले. श्रीकृष्णाने संयत तरीही रोखठोक आणि कमालीच्या व्यावहारिक वागण्याचा वस्तुपाठ

या प्रसंगी प्रस्तुत केला आहे, हेही लक्षात घ्यावयास हवे. संस्कृत साहित्याचा अभ्यास करत असताना असे अनेक प्रसंग सामोरे येत रहातात. ज्यांतून बरेच काही

शिकायला मिळत असते. विचारांना चालना मिळते. आजघडीला जी शास्त्रे , जे विषय अभ्यासले जातात त्यांच्या अभ्यास -विषयांत व संस्कृतमध्ये वर्णन केलेल्या

विषयांत कितीतरी साम्यस्थळे दिसून येतात. त्यामुळे आजही संस्कृत उपयोगी आहे, हे कळतं. शिशुपालवधाच्या प्रसंगातून कवीने वाचकांसमोर वागणुकीचे

अनेक पैलू प्रस्तुत केले आहेत, त्यातला योग्य पैलू कोणता हे सुजाण रसिकाला सहज समजू शकते. आणि असे

योग्य ते गुण, सवयी आपल्या अंगी याव्यात म्हणून सातत्याने प्रयत्न करणं हे सु‘संस्कृत’ पणाचं खरं लक्षण आहे !

 

 

 

 

 

 

 

Postbox – संस्कृता

 

www.postboxindia.com

www.postboxindia.com

Leave a Reply

error: Content is protected !!