India – भारतमाता की जय
India – भारतमाता की जय – संजय आवटे
‘भारतमाता की जय’ India असे चित्कारणा-यांना नेहरूंनी सांगितले होते – “भारतमाता म्हणजे कागदावरचा हा नकाशा नव्हे. भारत म्हणजे या देशातली करोडो जितीजागती माणसं आहेत. आणि, या करोडो माणसांची India भारतमाता वेगवेगळी असू शकते. ती सारखीच असावी, असा अट्टहास करायचं काही कारण नाही. शिवाय, प्रत्येकाला भारत हा मातेच्याच रूपात दिसावा, अशी सक्ती करायचंही कारण नाही.”
प्रत्येक माणूस महत्त्वाचा होतो, ‘आम्ही भारताचे लोक’ केंद्रबिंदू ठरतात, तेव्हा देश माणसांचा असतो. देशातली माणसं केंद्रस्थानी असतात. तिथंच, नेहरूंसारखा पंतप्रधान आपल्या धोरणांच्या चुकांची जाहीर कबुली देतो आणि त्यातून नवं धोरण विकसित करतो. शेतीचं आपलं धोरण फसल्याचं मान्य करतो, तेव्हा नव्या दिशेनं पाऊल तरी पडू शकतं.
हुकुमशहा आपल्या चुका कधीच मान्य करत नाहीत. त्यांचा देश माणसांसाठी नसतो. देशाच्या जयजयकारासाठी माणसांना चिरडताना त्यांना जराही यातना होत नाहीत. सगळ्यांनी एका भाषेत बोलायला हवं, एवढंच त्यांना समजतं. ते ज्याला देश म्हणतात, तोच देश. तसाच देश. तीच भाषा. तीच संस्कृती. त्यांना बोभाटा करायचा असतो. स्वतःची ‘लार्जर दॅन लाइफ’ प्रतिमा उभी करायची असते. दीनदुबळी माणसं मरणार. सैनिक हुतात्मे होत राहाणार. दंगलीत माणसं होरपळणार. हिंसाचाराच्या आगीत बायापोरं मृत्युमुखी पडणार. अशी सामान्य माणसं मरण्यासाठी जन्माला आलेली असतात. आपला जयजयकार महत्त्वाचा.
नोटाबंदीत माणसं चिरडून मेली. पण, ‘डिजिटल इंडिया’ आणि ‘पेपरलेस’चा, काळा पैसा हद्दपार झाल्याचा, दहशतवादाचा नायनाट झाल्याचा ‘युटोपिया’ त्याहून महत्त्वाचा होता.
आकस्मिक घोषित झालेल्या लॉकडाऊननं शेकडो मजूर टाचा घासून मेले. पण, आपण थाळ्या वाजवत राहिलो, दिवे पेटवत राहिलो.
Also Read : https://www.postboxindia.com/saraswati-named-durga-bharatkumar-raut/
आज डोळ्यांदेखत माणसं मरताहेत. देशभर चिता जळताहेत. ऑक्सिजन नाही, बेड मिळत नाहीत, लसीकरणाची राजधानी असलेल्या देशात लसच गायब आहे. आणि, तरीही आपण निवडणुका लढवतो आहोत. नवनवी भूमी पादाक्रांत केल्याचे ढोल वाजवत आहोत. नवी संसद बांधतो आहोत.
देशात आक्रोश आहे. पण, एवढं सगळं होऊनही पंतप्रधानांच्या तोंडी दिलगिरी नाही, माफी नाही. देशाचा जयजयकार करायचा आणि एका सूत्रात, एकचालकानुवर्ती व्यवस्थेत देश बांधायचा, तर काही माणसं मरणारच. पण, त्यांची चिंता करत बसायला इथं वेळ कोणाला? आपली प्रतिमा त्यापेक्षा महत्त्वाची. त्यासाठी असे बळी लागतातच. आपल्यासोबत सगळ्यांनी जयजयकार करायला हवा. जे करत नाहीत, ते मरण्याच्याच लायकीचे.
हिटलरच्या जर्मनीने मृत्यूचे तांडव पाहिले.
माओच्या चीनने असे कित्येक मृत्यू पाहिले.
आपण आज तेच पाहात आहोत.
आपल्याला पाच ट्रिलियन इकॉनॉमी असणारी बलाढ्य महासत्ता उभी करायची आहे. म्हणजे तसं म्हणत राहायचं आहे. एका सुरात बोलणारा ‘एकसंध’ देश उभा करायचा आहे.
सामान्य माणसं मरत असतात. आणखी मरतील.
पण, बलाढ्य – असामान्य देशाच्या शिखरासाठी एवढे लोक तर त्या पायात गाडावे लागतीलच!
Also Read : https://www.postboxindia.com/i-love-my-mumbai-bharatkumar-raut/
India – भयंकराच्या दरवाज्यात उभे आहोत आपण.
तळातल्या माणसाच्या डोळ्यातले अश्रू पुसणारे गांधी; ‘भारत’ नावाचे स्वप्न सत्यात आणण्यासाठी ‘नियतीशी करार’ करणारे नेहरू; सामाजिक- आर्थिक समता नसेल, तर राजकीय समता हा आभास असेल, असे तेव्हाच सांगणारे आंबेडकर ज्या देशाचे बाप आहेत, तिथे हे सगळे घडावे? तेही इतक्या लवकर? आणि, हा वारसा सांगत राजकारण करू पाहणा-यांनाही, या भयंकराची चाहूल नाही. मूल्यात्मक भान नाही!
मरणा-या प्रत्येक सामान्य माणसासोबत गांधी-नेहरू-आंबेडकरांचा भारत गाडला जातोय!
‘कोरोना’ तर उद्या जाणारच आहे.
पण, ‘अच्छे दिन’च्या बलाढ्य भ्रमापायी एका देशाचाच मृत्यू आपल्याला पाहावा लागणार आहे का ?
– संजय आवटे
(प्रा. आशुतोष वार्ष्णेय यांच्या ‘इंडियन एक्स्प्रेस’मधील आजचा लेख वाचतानाच्या मुक्त नोंदी!)