Dandekar college palghar – प्राचार्य सोनोपंत दांडेकर
स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन – Dandekar college palghar
10/7/2021
सोनोपंत मामांचा जन्म माहिम जवळ असणाऱ्या केळवे या गावी दिनांक २०एप्रिल १८९६ या दिवशी झाला.
पालघर येथे असणारे दांडेकरांचे घर हे एक लहानसे धर्मपीठ होते. उत्तरेकडून आणि दक्षिणेकडून येणारे
अनेक वैदिक आणि विद्वान पालघर स्टेशनवर उतरून मामांच्या घरी जात, रहात व तत्व चर्चा करीत.
बडोद्याचे महाराज दरवर्षी विद्वानांचा सत्कार करीत. या सत्कारसमारंभा पूर्वी दांडेकरांच्या घरचा पाहुणचार घेणे या पंडितांना आवडत असे.
त्यांचे प्राथमिक शिक्षण केळवे माहीमच्या प्राथमिक शाळेत पूर्ण झाले. पुढे ते माध्यमिक शिक्षणासाठी त्यांच्या
बंधूंसह पुण्याच्या नूतन मराठी विद्यालयात दाखल झाले. आणि मॅट्रिकची परीक्षा उत्तम रीत्या उत्तीर्ण झाले. त्याच सुमारास ते
विष्णुबुवा जोग या साक्षात्कारी पुरुषाच्या संपर्कात आले. विष्णू नरसिंह जोग तथा ‘जोग महाराज’ हे वारकरी संप्रदायाचे एक अध्वर्यू होते व
लोकमान्य टिळकांचे निकटचे मित्र होते. सोनोपंतांना जोग महाराजांमुळे हरिभक्ती व देशभक्तीबरोबरच ज्ञानेश्वरीची गोडी लहान वयात लागली.
पुढे त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयातून बी.ए. पदवी घेतली त्या काळी रॅंग्लर र. पु. परांजपे, गुरुदेव रा. द. रानडे अशा
अनेक नामवंत व्यक्ती तेथे प्राध्यापक म्हणून कार्यरत होत्या. त्यांपैकी तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक गुरुदेव रानडे व जोग महाराज
या दोन उत्तुंग व्यक्तींच्या सहवासाचा सोनोपंतांच्या जडणघडणीत मोठा वाटा आहे. त्यांना मुंबई विद्यापीठाची
प्रल्हाद सीताराम स्कॉलरशिप मिळाली आणि पुढे ते गुरुदेव रानडे यांच्या सांगण्यावरून पाश्चात्त्य तत्त्वज्ञानातील ग्रीक तत्त्वज्ञ प्लेटो हा विषय घेऊन एम.ए. झाले
त्यांनी शिक्षण प्रसारक मंडळ, पुणे या प्रसिद्ध शिक्षण संस्थेचे आजीव सदस्यत्व घेऊन
शिक्षणक्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला व न्यू पूना कॉलेजात (सध्याचे स. प. महाविद्यालय)
तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. तेथे सोनोपंतांनी तत्त्वज्ञान मंडळाची स्थापना केली .
सोनोपंत दांडेकर यांनी १९२५ साली तुकाराम महाराजांची गाथा आणि ‘सार्थ ज्ञानेश्वरी ‘हे महत्वपूर्ण संपादने केली.
त्याचप्रमाणे त्यांनी भागवत धर्म, श्री ज्ञानेश्वरी व ज्ञानेश्वर ,तुकाराम महाराज यांच्याविषयी अनेक स्फुट लेख त्यांनी लिहिले आहेत.
श्रीमद्भगवद्गीता : महाराष्ट्र सरकारचे प्रकाशन, सटीप ज्ञानेश्वरी ,सार्थ ज्ञानेश्वरी, साक्षात्कारपथावर तुकाराम अर्थात तुकारामांचे अध्यात्मीक चरित्र,
श्री ज्ञानदेवांचे जीवनविषयक तत्वज्ञान, ज्ञानेश्वरीतील कठीण शब्दांचा कोश, सार्थ ज्ञानेश्वरी प्रस्तावना, ज्ञानेश्वरी सेवा गौरव ग्रंथ,
भारतातील थोर स्त्रिया, श्रीसंत चोखामेळा महाराज यांचे चरित्र व अभंग गाथा, अध्यात्मशास्त्राची मुलतत्वे अशी अनेक पुस्तके प्रकाशित झाली.
त्याचप्रमाणे सोनोपंत दांडेकर यांच्या नावाचा पुरस्कार एखाद्या तत्वज्ञान विषयक ग्रंथाला दिला जातो.
वारकरी संप्रदायात मामासाहेब दांडेकर यांना खूप मान होता. हजारोंच्या संख्येने लोक त्यांच्या प्रवचनाला जमत असत.
मामानी नेवासा येथील ज्ञानेश्वर मंदिराचा जीर्णोद्वार केला. नेवासा येथील शंकराच्या मंदिरात ज्या एका खांबाला टेकून संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितली ते मंदिर
कालौघातात पडले होते. परंतु तो खांब मात्र टिकून राहिला होता .
त्या खांबाला केंद्रस्थानी ठेवून मामांनी भव्य ज्ञानेश्वर मंदिर बांधले.
जत संस्थानच्या राणी साहेबांनी सोनोपंत मामा यांना गुरुस्थानी मानले होते. राणीसाहेबांनी सोन्याचा कळस ज्ञानेश्वर माऊलीच्या चरणी अर्पण केला
व त्याची स्थापना सोनोपंत मामा यांच्या हस्ते करण्यात आली. याशिवाय त्यांनी पिंपळनेर येथील संत निळोबाराया मंदिर,
पुण्यातील निवडुंग्या विठोबा मंदिर आदी मंदिरांचा जीर्णोद्धार केला.
९ जुलै १९६८ रोजी सोनोपंत मामांचे पुण्यात निधन झाले. ही निधन वार्ता सर्वांना कळली.त्यावेळी पालखी पंढरपुरात होती.
धुंडामहाराज तेथेच होते. त्यांनी सांगितले मामांना इकडे आणा. पालख्या जागेवर आहेत. वारकरी पंढरपुरात आहेत.
मामांचा अंत्यविधी चंद्रभागेच्या तीरावर करू.” आळंदी करांनी आळंदीचा आग्रह धरला. शेवटी मामांची अंत्ययात्रा आळंदी कडे
वळली. जाता – जाता रामकृष्ण आश्रम ,एस .पी. कॉलेज, निवडुंगा विठोबा या पवित्र स्थानकावर थांबली.
पुणे आळंदी मार्ग लोकांनी गजबजून गेला. या यात्रेचे एक टोक पुण्यात तर दुसरे टोक आळंदीत होते.
बुक्का, गुलाल, फुले यांनी वाट रंगली होती. पालखी परत निघाली. वारकऱ्यांचा महापुर आळंदीच्या दिशेने वाहू लागला.
जेथे मामांनवर अग्निसंस्कार घडला ,त्या स्थानी वारकऱ्यांनी अक्षरशः लोटांगण घातले. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मामांचे विद्यार्थी आळंदीला आले.
डबडबलेल्या डोळ्यांनी त्यांनी एकमेकांकडे पाहीले ,मूकपणे मामांचे स्मरण केले. त्या सर्वांना इंद्रायणीच्या तीरावर आणखी एक सोन्याचा पिंपळ दिसू लागला.
त्यावेळी पुणे ते आळंदी अशी सुमारे २३ किलोमीटर अंतर चालत जाऊन त्यांची अंत्ययात्रा आळंदीला पोहोचली होती.
तेथे विष्णू महाराज जोग यांच्या समाधीच्या सानिध्यात श्री क्षेत्र आळंदी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.