dattaji shinde – मराठ्यांच्या पालखीचा गोंडा दत्ताजी शिंदे
dattaji shinde – मराठ्यांच्या पालखीचा गोंडा दत्ताजी शिंदे यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन
गाॅल्हेरचे शिंदे घराणे हे मराठी स्वराज्यातील अत्यंत शूर व पराक्रमी घराणे होय. सातारा जिल्ह्यातील कन्हेरखेडची पाटीलकी या घराण्याकडे होती. शिंदे घराण्यात राणोजी ,दत्ताजी ,जनकोजी ,जयाप्पा सारखे पुरुष मराठी साम्राज्याचे अभिमानी होऊन गेले. कुकडीच्या लढाईत निजामाच्या हत्तीची अंबारी खाली पाडणार्यात दत्ताजी शिंदे प्रमुख होते. दत्ताजी शिंदे हे अत्यंत शूर व पराक्रमी होते .ऊत्तरेत लाहोरचा बंदोबस्त दत्ताजी शिंदे यांनीच केला होता. त्यावेळी ऊत्तरेतील तिर्थक्षेत्रे मुक्त करून आणि बंगालपर्यंत स्वारी करून कर्ज फेडण्यासाठी दत्ताजी शिंदे पैसा उभा केला होता.
मराठ्यांच्या उत्तरकालीन इतिहासात शिंदे घराण्याचे फार मोठे योगदान आहे .या घराण्यातील राणोजी, महादजी या कर्तृत्ववान पुरूषामुळेच पानिपतचे अपयश धुवून निघाले व होते व ऊत्तर हिंदुस्तानात मराठ्यांचे वर्चस्व प्रस्थापित झाले. या घराण्याला दौलतीचे,स्वराज्याचे आधारस्तंभ म्हणण्यात आले. सन. 1758 मध्ये dattaji shinde दत्ताजींचे लग्न भागीरथीबाई यांच्याशी झाले .भागिरथीबाई या अत्यंत सालस ,हुशार व धोरणी होत्या. लग्न झाल्यावर दत्ताजी ऊज्जैनला आले. दत्त्ताजीं यांचा शूर व पराक्रमी स्वभाव पाहता मल्हारराव होळकरांनी त्यांनां नजीबाचे पारीपत्य करण्यास 10 जानेवारी 17 61 मध्ये पानिपतला पाठवले. दत्ताजींनी नजीबावर हल्ला केला.अफगाणी सैन्य बंदुका घेऊन तयार होते .मराठी सैन्याची मुख्य शस्त्रे म्हणजे तलवारी आणि भाले .मराठ्यांचा तोफखाना मुख्य तळावर राहिल्याने शत्रूच्या हल्ल्याला दत्ताजी आणि जनकोजीला समर्थपणे तोंड देता आले नाही.
बुरांडी घाटावर रोहिल्यांच्या गोळीबारात दत्ताजी शिंदे घोड्यावरून खाली आले .सुडाने फुरफुरलेले दत्ताजी रोहिल्यांकडे झेपावले .त्यातच समोरच्या गर्दीत त्यांना नजिबांचे तोंड दिसले ,तसे ते बेफान होऊन एकेकाला कंठस्नान घालीत दत्ताजी वादळासारखे घोंगावत पुढे जात होते. तोच समोरून कुतुबशहा व नजीर दत्ताजी शिंदे यांच्यावर झेपावले .दत्ताजी जखमी होऊन पडले होते.अंगात थोडी धुगधुगी दिसत होती. कुतुबशहाने “दत्ता ss” म्हणून हाक दिली तसे दत्ताजी यांनी त्यांच्यावर डोळे रोखले. कुतुबशहा म्हणाला ” क्यु पाटील, और लढोगेss?” आपला थंड पडत चाललेला देह आणि मंद मंद होणारा आवाज दत्ताजी यांनी एकवटला आणि ते दमदारपणे उद्गारले ,” क्यूं नही ?बचेंगे तो और भी लढेंगे ss!” या शब्दासरशी कुतुबशहाने चिडून दत्ताजीच्या छातीत खंजीर खुपसला.
दत्ताजीच्या मानेवर धारदार शस्राने वार करून त्यांचे मुंडके तोडले. हा भयंकर प्रसंग पाहून झाडावरची पाखरे सुध्दा थबकली. यमुनेचा प्रवाह सुद्धा स्तब्ध झाला.ईतका भयंकर प्रसंग होता तो. नजीबाने भाल्याच्या टोकाला दत्ताजी शिंदे यांचे मुंडके बांधून नाचत-नाचत अब्दालीकडे घेऊन निघाला. मराठ्यांचा भयानक पाठलाग सुरू होता. करून किंकाळ्यांनी रान भरले होते संहाराची परमावधी चालली होती .कोंबड्या ,बकर्यांसारखी माणसं टिपून मारली जात होती .यमुना काठ रक्तानं निथळत होता. त्याच वेळी महाराष्ट्रात घराघरात संक्रांतीचा सण साजरा होत होता. रेवड्या वाटल्या जात होत्या. तेव्हा कन्हेरखेडच्या दत्ताजी शिंदे यांचा कृष्णाकाठच्या मातीत खेळून पोसलेला देह यमुनाकाठच्या वाळूत धडाधडा जळत होता ! जनकोजींचा जखमी देह घेऊन मराठा सैन्य तळावर आले .त्यांच्या तोंडावरची घोंगडी पत्नी काशिबाई यांनी बाजूला केली. त्यांच्या सर्वांगावर जखमांचे वार दिसत होते. “पाणी sपाणी ss”असे जनकोजी क्षीण आवाजात पुटपुटत होते.जनकोजींच्या पत्नी काशीबाई गलबलून गेल्या. आणि ओरडू लागल्या ” माझ्या दौलतीचा राजा s शिपीभर पाण्याला तू महाग झालास का?” जनकोजी विचारू लागले, “माझे काकासाहेब कुठे आहेत? कुठे आहेत काका ?” सार्यांनी माना खाली घातल्या. भागीरथीबाई कावर्याबावर्या होऊन मुक्या हरिणीसारखे साऱ्यांकडे बघू लागल्या होत्या. झाला प्रकार त्यांच्या ध्यानात आला आणि त्या धाय मोकलून रडू लागल्या. तोंडात मारून घेऊ लागल्या.जमिनीवर हात आपटू लागल्या.
त्यांच्यासाठी धरती फाटली आणि आभाळ पण फुटलं. टाका कसा घालायचा ?त्या जोर जोरात किंचाळून रडू लागल्या.”माझ्या चांदसूर्या ss कुठे गेलास रे? कुणाची ही दौलत ,कुणाचे वाडे आणि राजवाडे ?माझ्या चांदाचा मुखडाही बघायला मिळाला नाही ,मला एकटीला टाकून कुठे गेलास रे माझ्या बाजींद्या सरदारा s?” भागीरथीबाईंच्या शोकाने सारे व्याकुळ झाले होते .परंतु पुढे भागीरथीबाईंनी आपला शोक आवरला .त्या जनकोजीना म्हणतात ” बाबा ,तुम्ही बायकांसारखे का रडता ?आपण सारेच असे बसलो तर वैरी सारी उरलीसुरली माणस घशात घालेल.चला उठाs”भराभरा निघूया जिच्यावर आभाळ कोसळले तिचे धीराचे बोल ऐकून साऱ्यांच्या उरात उभारी आली. मोडकी -तोडकी ,अर्धमेली फौज तशीच वाट तुडवत पुढे निघाली. भागीरथीच्या भाग्याचा गोळा ढगाआड गेला होता .आता पोटातला गोळा जगविण्यासाठी त्या जीवाच्या आकांताने पळत सुटल्या होत्या .नऊ महिने भरलेल्या भागिरथी बाई घोड्यावर बसून निघाल्या. पुढे भागिरथी बाई शिंदे बुरांडी घाटातून निसटुन कोटपुतली या भूईकोटला आल्या.तेथे त्या प्रसुत झाल्या.धावपळ व संकटामुळे मुलगा जगला नाही. या युद्धात कोवळी ,निष्पाप लेकरसुध्दा बळी पडली.हे मुल गेले आणि दत्ताजी शिंदे यांचा वंशच समाप्त झाला.निखळलेल्या गोंड्याचा साधा धागाही शिल्लक राहिला नाही. दत्ताजी शिंदे म्हणजे मराठ्यांच्या पालखीचा गोंडा होता .काळाने हा गोंडा खुडून नेला होता.
अहिल्याबाई होळकर या तेथेच तळावर होत्या. भागीरथीबाई यांची त्या समजूत काढत असतात. म्हणतात बाई रडू नका .आपण मराठी सरदारांच्या बायका .आपल लगीन सरदारांशी नव्हे तर तलवारीशी लागत. तलवार गळाली की आपण कोसळतो.”यावर भागिरथीबाई म्हणतात “बाईसाहेब, खंडेराव गेले तेव्हा त्यांचे तुम्ही अंत्यदर्शन तरी घेतले असेल.तिरडीवर चुडा तरी फोडला असेल” त्यांच्या अंत्यदर्शनाचे भाग्यसुध्दा मला लाभले नाही. मराठ्यांच्या इतिहासात अशा कितीतरी समंजस ,धाडशी ,पराक्रमी स्रिया होऊन गेल्या.
अशा या थोर दत्ताजी शिंदे dattaji shinde आणि भागीरथीबाई शिंदे यांना आमचा मानाचा मुजरा
लेखन डाॅ. सुवर्णा नाईक निंबाळकर संदर्भ मराठी विश्वकोष पानिपत विश्वास पाटील मराठी रियासत गो.स.सरदेसाई
1 Comment