Samvad – संवाद आणि संस्कार – संजय आवटे
Samvad – संवाद आणि संस्कार – संजय आवटे
एक सभ्य, सहिष्णू, कुटुंबवत्सल असं घर. घरातली माणसं गोड. शिकणारी, वाचणारी, कलासक्त अशी.
एकमेकांशी प्रेमानं बोलणारी. शेजा-यांशीही तेवढ्याच बंधुत्वानं वागणारी. कधी झालंच काही भांडण, तरी
शांतपणानं आपला मुद्दा पटवून देणारी.
तसं ते गावही शांत. सगळे गुण्यागोविंदानं नांदणारे. समस्या नव्हत्या त्या गावात, असं नाही. पण, त्यावर
सगळे मिळून तोडगा काढणारे. एकमेकांशी samvad संवाद करणारे. प्रसंगी सरपंचाचाही कान पकडणारे.
त्या गावात कोणीतरी नवा माणूस राहायला आला.
या शांत गावात त्याचा भारदस्त आवाज खास जाणवणारा होता. त्यानं गावातल्या लोकांना एकत्र करून
नवं देऊळ बांधायला सुरूवात केली. मग त्यानं गावक-यांना सांगितलं. अरे, ते पलिकडचे आपले शत्रू आहेत.
इकडच्या गल्लीतले तेवढे आपले आणि पलिकडचे शत्रू. मग त्यानं त्यांच्यात मस्त जुंपवून दिली. काहीच हालचाल
नसलेल्या गावात जोरजोरात भांडणं सुरू झाली. एकमेकांना शिवीगाळ, जोरदार बदनामी असलं बरंच काही सुरू झालं.
रोज सकाळी दवंडी सुरू झाली. आपल्या गावात किती काय-काय घडतंय, या कल्पनेनंच ग्रामस्थ खुश होऊ लागले.
पलिकडच्या गल्लीतल्यांना वठणीवर आणलंय, या समाधानात रोज बिनघोर झोपू लागले.
कुटुंबवत्सल घरातल्या लोकांचा याला विरोध होता. त्यांच्या बाजूनं गावातले बरेचजण होते. काही मूक होते,
तर बरेच बोलत होते. पण, गावच्या आवाजापुढं त्यांचं काही चालत नव्हतं.
गावात तशी चांगली शाळा होती. छान शेती होती. पण, यानं गावात मंदिराचं काम सुरू केलं. शाळा वगैरे सोडून लोक उत्तेजित होऊन मंदिराच्या बांधकामात दंगले. त्यानं अशी भुरळ घातली की लोकांनी त्याला गावचा सरपंच करून टाकले. त्यानं मग हळूहळू गावातलं सुसज्ज ग्रंथालय बंद करून टाकलं आणि प्रत्येकाला मोफत इंटरनेट, वायफाय दिलं. तासनतास पोरं मोबाइलमध्ये मश्गुल राहिली. ही गल्ली विरुद्ध ती गल्ली असल्या पोस्ट टाकत वेळ काढू लागली. गावात पूर्वी काहीच घडत नव्हतं. आता गावात काहीतरी घडतंय, असं गावक-यांना वाटू लागलं. गावात नदी होती. लोक नावेतनं पलिकडं जायचे. लवकरच गावात स्पीड बोट येणार, म्हणून त्यानं गावातल्यांना सांगितलं. आता नळाला रोज पाणीही येत नाही, हे विसरून सगळे हरखून गेले. पूर्वीचे थंड दिवस गेले. आता भारी दिवस येणार, या कल्पनेने सगळे तरूण खुश झाले. त्याच्या भक्तांची संख्या दररोज वाढू लागली.
बायाबापड्या आणि म्हाता-यांनाही हा सरपंच आवडला. आधीच्या सरपंचानं लय पैसे खाल्लेले. कामांच्या नावानं बोंबच. सगळं गाव गरीब, पण त्या सरपंचाच्या शेतात ट्रॅक्टर. घरात चार मोटारी. पोराला कारखान्याचा डायरेक्टर, पुतण्याला मेंबर केलेले. हा सत्पुरूष एकटा. ना बायको, ना पोरबाळ. कसला पाश नाही. फक्त गावच्या विकासासाठी झटणारा. शिवाय, देऊळ बांधणारा, सतत गावात भजन, कीर्तन, पारायण असले कार्यक्रम करणारा. गावाला हागणदारीमुक्त करण्यासाठी झटणारा. गाव स्वच्छ करण्यासाठी सगळ्यांच्या हातात झाडू देणारा. रोज वेगवेगळ्या रुपात येऊन गावक-यांना नवा कार्यक्रम देणारा.
Also Read :https://www.postboxindia.com/covid-william-morris-and-luxury-vidyadhar-date/
बाहेरच्या गावांत या गावाची चर्चा सुरू झाली. बदनामी असो की ख्याती, पण चर्चा samvad तर सुरू झालीच.
हे सगळं भयंकर आहे, हे त्या सहिष्णू कुटुंबाला कळत होतं. ते शांतपणे याला विरोध करत होते. त्यांच्यासोबतचे लोक वाढतही होते.
हळूहळू हे सगळे सहिष्णु लोक त्याला जाहीरपणे शिव्या घालू लागले. त्याच्याबद्दल अर्वाच्च भाषेत बोलू लागले. त्याची आणि त्याच्यासोबत जे आहेत, त्यांची असलेली- नसलेली लफडी- कुलंगडी सांगू लागले. त्यांच्याकडचं कोणी मेलं तर थेट मसणवाट्यावरच जल्लोष करू लागले. रोज आता हे सुरू झालं. शाळा, ग्रंथालय, शेती, रोजगार यावर नाही, तर त्याच्यावरच ते रोज बोलू लागले.
मग, अख्ख्या गावात मनोरंजनाची धमाल सुरू झाली. रोजची होळी रंगू लागली. कोणीच कोणाला सिरियसली घेईना. पण, जगण्यात मजा मात्र येऊ लागली.
तो गडी फारच खुश होता.
त्याला विचारलं, “बरेच लोक आता तुम्हाला डायरेक्ट शिव्या घालतात. तरी, तुम्ही खुश कसे?”
सैतानी, विकट हसत तो म्हणाला, “माझ्या भक्तांपेक्षा हे लोक मला जास्त आवडतात. आता, माझी भाषाच त्यांची मातृभाषा झाली आहे. माझा हाच विजय आहे. माझे खरे अनुयायी हे लोक आहेत!आता तर चिंताच सोडा. जगाच्या अंतापर्यंत मी या गावावर राज्य करू शकणार आहे.”
– संजय आवटे