एक संस्था अस्त झाली. भारतीय सिनेमाचा जेंव्हा इतिहास लिहला जाईल. तेंव्हा नेहमी दिलीपकुमार यांच्या आधी आणि दिलीपकुमार
यांच्यानंतर अशा प्रकारे लिहिला जाईल अशी प्रतिक्रिया अँग्री यंग मॅन, सुपरस्टार अमिताभ बच्चन यांची होती.
अभिनयाच्या जगात एका मान्यवराने दुसऱ्या बुजुर्ग अभिनेत्याविषयी व्यक्त केलेली ही कृतज्ञता होती.
भारतीय सिनेसृष्टीत सहा दशके रसिकांच्या मनावर अधिराज्य करणारा आणि उत्तम अभिनयासाठी फिल्मफेअर
पुरस्काराचा रेकॉर्डब्र्रेक त्यांच्या नावावर कायम आहे. मूळचे पेशावरचे पण रोजीरोटीसाठी प्रथम नाशिकच्या
देवळाली भागात आलेले मोहम्मद युसूफ खान यांनी नंतर फळ विक्रेता आणि पुण्याच्या मिलीटरी कँटीनजवळ सँडविच विकण्याचे काम केले.
सिनेसृष्टीतील प्रवास त्यांनी १९४४ साली ज्वार भाटा या चित्रपटातून सुरु केला. सिनेसृष्टीत आल्यानंतर ते दिलीपकुमार
म्हणून ओळखले जाऊ लागले. ट्रॅजेडी किंग अशी त्यांना उपमा मिळाली. त्या जमान्यात गंभीर स्वरुपाच्या भूमिका
त्यांनी उत्तम अभिनयाच्या जोरावर लिलया साकारल्या होत्या. शोकात्म अथवा शोकांतिका स्वरुपाचे सिनेकथांचे ते अनभिषक्त हिरो होते.
त्यांच्या जीवनप्रवासाच्या आत्मचरित्रात त्यांचे अनेक किस्से आहेत. त्यांचे पहिले प्रेम होते ते सौंदर्यवती अभिनेत्री मधुबाला यांच्यावर.
तथापि मधुबाला आणि तिच्या वडिलांचा इगो आणि दिलीपकुमार यांचा स्वाभिमान यामुळे ती प्रेमकथा उभयतांच्या लग्नाच्या वास्तवात पूर्ण होऊ शकली नाही.
दिलीपकुमार आणि सायराबानो ( dilip Kumar saira Banu )यांच्यातील प्रेमकथा ही फिल्मी स्टोरीपेक्षा कमी नाही. सायराबानो अल्लड स्वप्नाळु वयात
म्हणजे वयाच्या १२ व्या वर्षी दिलीपकुमार यांच्या प्रेमात पडली. एका मुलाखतीत सायराबानो यांनी म्हटले आहे की लहानपणी दिलीपकुमार
यांचा आन सिनेमा बघितला आणि मनात निश्चय केला की लगीन करीन तर याच अभिनेत्याशी. दिलीपकुमार यांच्या व्यक्तीमत्वावर
देश विदेशातील तरुणी आकृष्ट झालेल्या होत्या. मोठी झाल्यानंतर सायराबानो यांनी सिनेअभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले.
दुर्दैव असे की सायराबानो यांचे सुरुवातीचे दोन सिनेमे आपटले. दोनदा प्रेमभंगाचा अनुभव घेतलेले दिलीपकुमार यांनासुद्धा सायराबानो
यांच्याविषयी आकर्षण निर्माण होण्याचा प्रश्नच नव्हता. दिलीपकुमार एकदा सायराबानो यांना उद्देशून म्हणाले की अरे मेरे सफेद बाल तो देखो.
पण सायराबानो यांच्या मनावरील दिलीपकुमार ( dilip Kumar saira Banu ) यांचे व्यक्तीमत्वाचे गारुड कमी व्हायला तयार नव्हते. दिलीपकुमार यांना जे जे आवडेल,
रुचेल असे वागण्याचा सायराबानो यांनी प्रयत्न केला. सायराबानो यांची प्रदीर्घ काळाची प्रतिक्षा संपली आणि
दिलीपकुमार आणि सायराबानो यांच्यात निकाह झाला. ते वर्षे होते १९६६ सालचे. दोघांच्या वयात २२ वर्षांचे अंतर आहे.
त्यानंतर हिमालयाच्या सावलीसारखी सायराबानो यांनी दिलीपकुमार यांची काळजी घेतली. ५५ वर्षांचे उभयतांचे
वैवाहिक सफल आयुष्य आज बुधवारी संपुष्टात आले. काळाच्या पडद्यावरुन कायमची एक्झीट घेणारे दिलीपकुमार यांचे वय ९८ वर्षांचे होते.
त्यांच्या जीवनप्रवासात सायराबानो यांची साथ अनमोल होती यात दुमत असण्याचे कारण नाही.
दिलीपकुमार यांनी ज्वारा भाटा सिनेमापासून करिअर सुरु केले असले तरी त्यांची पहिला यशस्वी चित्रपट होता जुगनू.
मात्र, त्यांचा चित्रपट प्रवास पाहण्याआधी त्यांची माहिती जाणून घेऊया. पाकिस्तानच्या पेशावरमध्ये लाला गुलाम सरवर यांचे
चिरंजीव दिलीपकुमार जन्मास आले. आपल्या घराचा काही भाग भाडेपट्टा देऊन आणि फळविक्री करुन त्यांच्या कुटुंबाचे गुजराण होत असे.
त्यांना त्यांच्यासकट एकूण १२ भाऊ बहीण होते. १९३० साली त्यांचे सारे कुटुंब मुंबईत चरितार्थासाठी आले.
ते सुरुवातीला नाशिकच्या देवळाली भागात राहत असायचे. यामुळे दिलीपकुमार यांना मायबोली मराठी पण नाशिक ढंगाची बोलता येत असे असे त्यांचे निकटवर्तिय सांगतात. १९४० साली वडिलांशी मतभेद झाल्यानंतर दिलीपकुमार यांनी मुंबई सोडून थेट पुणे गाठले. पुण्यात त्यांची गाठ एक कँटीन चालक ताज मोहंमद शास यांच्याशी झाली. त्यांच्या मदतीने दिलीपकुमार यांनी पुण्यातील आर्मी क्लबमध्ये एक सँडवीच स्टॉल सुरु केला होता. कँटीनचे कंत्राट संपुष्टात आल्यानंतर दिलीपकुमार पुन्हा मुंबईत परतले. पण त्यांच्या हातात त्यावेळी पाच हजार रुपयांची बचत होती. आपल्या वडिलांना मदत करण्यासाठी ते दिलीपकुमार काम शोधू लागले. १९४३ साली चर्चगेट रेल्वे स्टेशनमध्ये त्यांची गाठ डॉ मसानी यांच्याशी झाली. तेथूनच त्यांचा सिनेप्रवासाचे दार किलकिले झाले. बाँबे टॉकीजमध्ये दिलीपकुमार यांना नोकरीची ऑफर मिळाली.
यानंतर दिलीपकुमार यांची ओळख बाँबे टॉकीजच्या मालकीन देविका रानी यांच्याशी झाली. वर्षाकाठी १२५० रुपयांच्या मेहनताना घेऊन काम करण्याचा करार त्यांच्यात झाला. त्याकाळचे प्रसिद्ध अभिनेते अशोककुमार यांच्याशी दिलीपकुमार यांची ओळख झाली. दिलीपकुमार यांच्या अभिनयाने अशोककुमार प्रभावित झाले. उर्दू आणि हिंदी भाषेवर दिलीपकुमार यांचा वरचष्मा होता. ते अशोककुमार यांना चित्रपट लेखनात अशोककुमार यांना मदत करीत होते. देविका रानी यांच्या म्हणण्यानुसार दिलीपकुमार यांनी आपले नाव युसूफचे दिलीप असे ठेवले होते. १९४४ साली दिलीपकुमार यांना प्रमुख अभिनेत्याची भूमिका मिळाली पण तो चित्रपट बॉक्स ऑफीसवर फ्लॉप ठरला. ज्वार भाटा सिनेमा आपटला पण त्यानंतर जुगनू चित्रपट हीट ठरला, आणि दिलीपकुमार हे रातोरात स्टार बनले. त्यांच्याकडे नवीन चित्रपटांची मालिका सुरु झाली. १९४९ साली दिलीपकुमार यांनी राजकपूर आणि नर्गिस यांच्यासोबत अंदाज चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. ही त्याकाळी सर्वाधिक कमाई देणारा चित्रपट ठरला होता.
दिलीपकुमार यांना खूप मानसन्मान मिळाले. ते कृतार्थ आनंदी जीवन जगले. एका अर्थाने ते हिंदी चित्रपटसृष्टीचे ते महानायक होते. पद्मभूषण, पद्मविभूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार, माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्यानंतर पाकिस्तानने त्यांना निशान ए पाकिस्तान हा पुरस्कार बहाल केला होता. त्यांना चित्रपट कारकिर्दीत उत्तम अभिनेता म्हणून फिल्मफेअरचे आठ पुरस्कार लाभले आहेत हा एक विक्रमी उच्चांक आहे. ते काही काळ राज्यसभेत खासदार होते. त्यांनी मुंबईचे शेरीफ अथवा नगरपाल म्हणून काम पाहिले आहे.
हिंदी चित्रपटासाठी १९५० चे दशक अनमोल ठरले. याच काळात ट्रॅजेडी किंग म्हणून दिलीपकुमार यांची प्रतिमा रसिकांसमोर उदयास येत होती. जोगन, दीदार, दाग अशा चित्रपटांमुळे सिनेरसिक त्यांना ट्रॅजेडी किंग म्हणून ओळखू लागले. दाग चित्रपटातील अभिनयामुळे दिलीपकुमार यांना प्रथम बेस्ट अभिनेता म्हणून फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. शराबी म्हणजे दारुडा प्रेमी ही भूमिका देवदास या चित्रपटात उत्तम अभिनयाच्या जोरावर दिलीपकुमार यांनी साकार केली. देवदास या सिनेमात त्यांच्यासोबत वैजयंती माला आणि सुचित्रा सेन या अभिनेत्रींनी काम केले होते.
१९६० साली कोहिनूर हा त्यांचा चित्रपट गाजला. साठच्या दशकात त्यांनी त्यांचे भाऊ नासीर खान यांच्यासोबत गंगा जमुना सरस्वती चित्रपटात काम केले पण तो चित्रपट काही चालला नाही. देवदास, नया दौर आणि मुगल ए आझम या चित्रपटातील अभिनयामुळे लोकांनी त्यांना डोक्यावर घेतले होते. १९५१ साली तराना चित्रपटाच्या शूटींग दरम्यान दिलीपकुमार आणि मधुबाला यांची प्रथम ओळख झाली होती. त्यांनी आपले प्रेम कधी लपवून ठेवले नाही. दिलीपकुमार आणि मधुबाला यांच्यातील प्रेमलीला त्यांच्या चाहत्यांना अमान्य नव्हत्या. प्रेमात आकंठ बुडालेले दिलीपकुमार आणि मधुबाला ही जोडगळीला लोकांना अनेकदा एकत्र फिरताना पाहिले होते. मधुबालाचे दर्शन घेण्यासाठी दिलीपकुमार हे मुंबईहून पुण्याला कार चालवत जायचे. मधुबालाला दुरुन पाहिल्यानंतर दिलीपकुमार पुन्हा मुंबईला यायचे असा किस्सा आहे.
दिलीपकुमार आणि मधुबाला यांच्यात लगीन ठरले होते. मधुबालाच्या वडिलांशी दिलीपकुमार आणि मधुबाला या दोघांचाही वाद झाला होता. वादानंतर ते दोघे परस्परांना सोडण्यास तयार नव्हते आणि वडिलांशी झालेले भांडणही विसरायला तयार नव्हते. या वादामुळे वडिलांना सोडून तू माझ्याकडे ये असा प्रस्ताव दिलीपकुमार यांनी मधुबालाला दिला होता. तर माझ्या वडिलांची तुला माफी मागावी लागेल असे मधुबाला यांचे आग्रही म्हणणे होते. दिलीपकुमार आणि मधुबाला हे दोघेही त्यांच्या हटवादी भूमिकेपासून दूर जायला तयार नव्हते. परिणामी नऊ वर्षांच्या दोघांतील मधुर संबंधाचा अखेर विरहात रुपांतर होऊन ते प्रेमसंबंध संपुष्टात आले. मधुबालाच्या वडिलांचा दोघांच्या नात्याला विरोध नव्हता. ते चित्रपट निर्मिती कंपनी चालवित असल्यामुळे दोघांनी याच कंपनीत अभिनेता अभिनेत्री म्हणून काम करण्याची अट दिलीपकुमार यांना मान्य नव्हती. १९५६ साली मलमल सिनेमाच्या शूटिंग दरम्यान, दिलीपकुमार यांनी मधुबालाशी लग्न करण्याचा प्रस्ताव मांडला होता. चलो काझी इंतजार कर रह है, आज मेरे घर शादी कर लेते है हा दिलीपकुमार यांचा प्रस्ताव ऐकून मधुबाला हिला आपल्या अश्रूंना आवर घालता आला नाही. ती हमसून रडायला लागली. अगर आज चला गया तो मै लौटकर वापस नही आऊंगा असे दिलीपकुमार म्हणाले होते.
मधुबालाची इच्छा असूनही ती दिलीपकुमार यांच्यासोबत जाऊ शकली नाही. इगो त्यांच्यात आडवा आला आणि नऊ वर्षांचे दिलीपकुमार आणि मधुबाला यांच्यातील संबंध संपुष्टात आले.
१९६० साली के. आसीफ यांची मुगल ए आझम हा चित्रपट क्लासिक होता. बिग बजेट असलेल्या या चित्रपटातील भव्य सेटस, संवाद, कॉश्युम्स, गीत संगीत सारे काही अप्रतिम होते. बुजुर्ग अभिनेता पृथ्वीराज कपूर यांनी साकारलेली शहेनशाह अकबरची भूमिका, दिलीपकुमार यांची शहजादा सलीमची भूमिका आणि अनारकली मधुबालाचा सौंदर्यवती आरासपानी अभिनय अदाकारी यामुळे हा चित्रपट आशिया खंडात गाजला. मुगल ए आझम या चित्रपटातील दिलीपकुमार यांची भूमिका हा त्यांच्या कारकिर्दीतील अभिनयाचा कळस आहे.
मुगल ए आझम चित्रपटाचे निर्माते शापूरजी मेस्त्री यांनी पाण्यासारखा पैसा ओतला. त्यात या पारशी बावाचे पागलपन दिसून येते. सलीम-अनारकलीच्या प्रेमकथेच्या माध्यमातून धर्मनिरपेक्ष भारताबद्दलचे सामाजिक भाष्य केले गेले आहे.
सूत्रधाराच्या रूपात हिंदुस्थानच्या नकाशाचे आत्मकथन सुरू होते.
‘मैं हिंदोस्तान हूं। हिमालय मेरी सरहदों का निगहबान है। गंगा मेरी पवित्रता की सौगंध है। तारीख की इंत्तिदा से मैं अंधेरों और उजालों का साथी हूं और मेरी खाक पर संगेमरमर की चादरों में लिपटी हुई ये इमारतें दुनिया से कह रही है कि जालिमों ने मुझे लूटा और मेहरबानों ने मुझे संवारा, नादानों ने मुझे जंजीरें पहना दी और मेरे चाहने वालों ने उन्हें काट फेंका। मेरे इन चाहने वालों में एक इंसान जलालुद्दीन मोहम्मद अकबर था। अकबर ने मुझसे प्यार किया। मजहब और रव्वायत की दीवार से बुलंद होकर इंसान को इंसान से मुहब्बत करना सिखाया और हमेशा के लिए मुझे सीने से लगा लिया।’’
मुगल ए आझम सिनेमात सलीमची भूमिका निभावताना दिलीपकुमार यांचा हा संवाद मनाला भावणारे आहेत.
तकदीरे बदल जाती है, जमाना बदल जाता है, मुल्कोंकी तारीख बदल जाती है, शहेनशाह बदल जाते है, मगर इस बदलती हुयी दुनियामे, मुहब्बत जिस इन्सान का दामन थाम लेती है, वोह इन्सान नही बदलता….
मुहब्बत करनो वालो की बस इतनाही है अफसाना, तडपना चुपके चुपके, आह भर जाना, घुटके मर जाना…
मुहब्बत जो डरती है वह मुहब्बत नही,
अय्याशी है, गुनाह है
बुजूर्ग महानायक अभिनेता दिलीपकुमार आपल्या स्मृतींना भावपूर्ण आदरांजली.