I am a looser – देवेंद्र फडणवीस नावाचे तरूण आणि दारूण अपयश
I am a looser – देवेंद्र फडणवीस
शशिकांत ओहळ
6/6/2021,
लहानपणी विटी-दांडूचा खेळ खेळताना मुलांची हार-जीत होते. जिंकलेल्यांचा उत्साह अनावर असतो, तर हरलेले मात्र हिरमुसलेले असतात.
त्यातील काहींना विजयी पक्षाने आपली फसवणूक करून विजय मिळवला असे वाटत असते. त्यामुळेच झालेल्या पराभवाचा सूड उगवला पाहिजे
म्हणून ते दात ओठ खात असतात. त्यातूनच मग ते विटी पळव , दांडू पळव अशा युक्त्या योजून विजयी पक्षाला जेरीस आणण्याचे प्रयत्न करीत असतात.
यात काही फार नविन आहे असे नाही. शेवटी बालपणच ते. पराभव पचवण्याची क्षमता या वयात आलेली नसते. म्हणून मग कुठले तरी सुडघेऊ प्रयत्न सुरू होतात.
हे सारे आठवण्याचे कारण म्हणजे I am a looser माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘ दृष्टी आणि कोन ‘ या कार्यक्रमात व्यक्त केलेली आपली मते.
२०१९ मध्ये शिवसेना – भाजपा युतीला बहुमत मिळालेले असतांनाही शिवसेनेने भाजपाला बाजूला ठेवीत कॉंग्रेस राष्ट्रवादी च्या सहकार्याने सरकार स्थापन केले.
या घटनेचा आपल्याला राग आला आणि आपण, पक्ष कार्यकर्त्यांच्या विरोधात जाऊन अजित पवार यांच्यासोबत सरकार स्थापन केले, असे
I am a looser फडणवीस यांचे म्हणणे.
त्यांचे हे विधान थेट त्या विटी-दांडूच्या खेळासारखेच म्हणावे लागेल. महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यातील राजकारण
हे असे निवडक लोकाच्या राग- लोभावर चालणार असेल तर महाराष्ट्राचे यापुढे काही खरे नाही .
त्यातल्या त्यात फडणवीस यांच्यासारखे लोक जर राजकीय आघाडी सांभाळणार असतील तर निश्चितच असेच म्हणावे लागेल.
खरे म्हणजे देवेंद्र फडणवीस हे नशिबवान नेते. राजकारणासारख्या निसरड्या क्षेत्रात एखाद्या तरूण माणसाला एखादे घबाड हाती लागावे,
ज्याची आयुष्यात कधी अपेक्षा ठेवली नाही एवढे मोठे पद मिळावे, पक्षश्रेष्ठींचा संपूर्ण पाठिंबा मिळावा, पक्षांतर्गत कुठलीही स्पर्धाच असू नये
आणि राजकारणाचे सारे मैदान मोकळे मिळावे असे त्यांचे नशिब थोर ! स्वत: च्या बुलेट ट्रेनच्या स्पीडने धावणाऱ्या
पक्षाला पुरेसे बहुमत मिळालेले नसले तरी युती पक्षाच्या भरवशावर त्यांनी मुख्यमंत्री पदाचा आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला.
दुसऱ्या कार्यकाळासाठी निवडणुकीला सामोरे गेले तेंव्हा येणारे पुढील राजकारण आपली आतापर्यंतची राजकीय कारकीर्द झाकोळून टाकणार आहे
हे त्यांच्या गावीही नसावे. पण पाच वर्षे त्यांनी जो एक हाती कारभार केला आणि केवळ दिल्लीश्वरांच्या मर्जीने राज्याचा गाडा हाकलला
तोच एककल्ली कारभार फडणवीस यांच्या अंगलट आला. त्यांचा वारू चौफेर उधळला होता. महाराष्ट्रातील बडे बडे नेते मंत्रालयातील
सत्तेचे तीव्र केंद्रीकरण उघड्या डोळ्यांनी पहात होते. या पाच वर्षांच्या कारकिर्दीत फडणवीस यांनी एककल्ली कारभार तर केलाच.
पण, पक्षात त्यांच्यासमोर आव्हान उभे करण्याची क्षमता असणाऱ्या नाथाभाऊंना त्यांनी घरी बसवले. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी मधील
जे कुणी गळाला लागू शकणार होते त्यांना येन केन प्रकारेण भाजपवासी करून घेण्यात आले. ही सारी स्पर्धाच संपुष्टात
आल्यानंतर फडणवीस जणू हवेत उडायला लागले. शासन प्रशासन ठप्प झाले. गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील किंवा विनोद तावडे
आणि मंत्रिमंडळातील इतर सारेच मंत्री जणू काही आपण सारे राजकारणामृत जन्मत: च कोळून प्यायलो आहोत या पध्दतीने
राज्यभर संचार करू लागले. ज्यांची कधी आपल्या मतदार संघात निवडून येण्याची पात्रता नव्हती ते थेट सोनिया गांधी
आणि राहुल गांधींवरही हल्ले बोलू लागले. हे सारे करीत असतांना लोक आपल्या वर्तणुकीवर नजर ठेवून आहेत याचा विसर त्यांना पडला.
राज्यातली ही एकहाती सत्ता केवळ आपली नसून शिवसेनेच्या जोरावर आहे हे धरातलावरील पूर्ण सत्य ते विसरले.
महाराष्ट्रात शरद पवार नावाची एक राजकीय संस्था आहे हे तर जणू त्यांच्या ध्यानी मनीही नव्हते.
उलट लोक ज्यांना त्यांच्या जाणतेपणाकरिता ओळखतात, ज्यांना ‘ जाणता राजा ‘ म्हणतात हे सत्य देखील ते खोडून काढायला निघाले.
उलट ‘ शरद पवार यांचे राजकारण आता संपले आहे ‘ अशी दर्पोक्तीही मिरवली गेली. महाराष्ट्राच्या राजकारणात मराठा समाजाचे प्राबल्य मोठे
आहे हे कोण जाणत नाही ? कोण मानत नाही ? सारेच मानतात. पण, रेशिमबागेला पवारांचा कायम दुस्वास. त्यांना हरविण्यासाठी इतर
ओबीसींना संघटित करून आपण मराठ्यांचा कायम बंदोबस्त करू शकू असे हिशेब रंगले. बुध्दिबळाच्या पटावरून जाणते राजे हटविण्याचे प्रयत्न झाले.
राजकारणातली एक खेळी म्हणून एका जाणत्या राजा ऐवजी थेट छत्रपतींच्या घराण्यातील दोन- दोन राजांसाठी पायघड्या अंथरण्यात आल्या.
संभाजी राजे असोत, की उदयन राजे, छत्रपतींचे वंशज म्हणून त्यांचा सन्मान मोठा. पण, गडचिरोली पासून गुहागर पर्यंत च्या
महाराष्ट्रातील राजकारणात हे दोन्ही राजे कधीही नव्हते. छत्रपतींचा सन्मान वेगळा आणि गावकीचे, तळा- गाळातले राजकारण वेगळे
हे समीकरण बुध्दिबळाच्या पटावर न दिसणारे. सारे राजकारण मलमपट्टीचे. असे कुठे राजकारण होत असते ?
मराठा समाज राजकीयदृष्ट्या जागरूक. हे फोडाफोडीचे राजकारण डोळ्यांदेखत पाहिले जात होते. पण सत्तेपुढे शहाणपण चालणारे नव्हते.
आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला. महाराष्ट्राच्या इतिहासात कधी नव्हे तो मराठा समाज संघटित झाल्याचे चित्र साऱ्या देशाने पाहिले.
फडणवीस मराठा आरक्षणाला आपला पाठिंबा असल्याचे रोज रोज सांगत होते. न्यायालयात ते कसे टिकेल असे प्रयत्न करणे आवश्यक होते.
पण ते झाले नाही. केंद्र सरकारची या कामी थेट मदत घ्यायला हवी होती. ते देखील झाले नाही. उलट, सेव्ह नेशन- सेव्ह मेरिटवाले न्यायालयात धडकले.
साऱ्या आरक्षण प्रश्नाचा बोजवारा उडाला. मराठा समाजाची चुळबूळ वाढली होती. हे असेच होणार हे काय त्यांना माहित नव्हते ?
नाशिक आणि परिसरातील शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी आंदोलन केले. रस्तोरस्ती दूध वाहिले. शेतकऱ्यांनी लॉंग मार्च काढला.
आंदोलन पसरले. हे न्याय्य मागण्यांसाठी चाललेले शेतकरी आंदोलन संपविण्यासाठी पुन्हा फूटपाडे धोरण आले.
रात्रीच्या अंधारात वर्षा बंगल्यावर शेतकरी नेत्यांपैकी दोघा-चौघांशी चर्चा करतांनाचे मुख्यमंत्र्यांचे व्हिडिओ झळकले.
आंदोलनकर्त्यांशी चर्चा करण्याचे कुठे असे स्वरुप असते ? रात्रीच्या अंधारात कुठे लोक आंदोलने संपवली जात असतात ?
मराठा समाजाच्या अवहेलनेची ही दोन ठळक उदाहरणे ! या पार्श्वभूमीवर २०१९ च्या निवडणुका आल्या. कॉंग्रे जणू संपल्यागत होती.
राष्ट्रवादी पोखरल्या गेली होती. आता शिवसेना संपविणे हेच जणू एकमेव लक्ष्य होते. जागावाटप वादग्रस्त करण्यात साडे तीन शहाण्यांना यश मिळाले.
संपूर्ण बहुमताची घोषणा आली. ती वल्गना होती हे तर नंतर सिध्दच झाले. निवडणुकीचे निकाल आले. कौल युतीच्या बाजूने होता.
पण, बालहट्टाने पेट घेतला. मुख्यमंत्रीपद देणार नाही ही नवीन घोषणा आसमंतात रंगली . पुढे पुढे संघर्ष अधिक टोकदार होत गेला.
सुईच्या अग्रावर मावेल एवढीही जमीन मिळणार नाही, हा इतिहासदत्त अहंकार पुन्हा जागृत झाला.
पण, शिवसेना या वेळी गाफील नव्हती. आपल्या शांत स्वभावासाठी प्रसिद्ध असणारे उध्दव ठाकरे आता करारी भूमिका घेऊन होते.
पण, संघी अहंकार मात्र कायम होते. या राजकारणाने महाराष्ट्राला एक नविन घोषणा दिली. ‘ मी पुन्हा येईन ‘ या घोषणेने चहू बाजूंनी फेर धरला.
राजकारण बहकले. पण घोषणा अमर झाली. या घोषणेचा उध्दार गावा गावातील चावड्यांवर आणि टपऱ्यांवर देखील होऊ लागला.
मोठी माणसे उगीच मोठी होत नसतात. त्यांना मोठे करण्यात अशी घोषवाक्ये महत्वाची भूमिका बजावतात. ‘ तुम मुझे खून दो..’
या घोषणेत देखील ‘ तुम ‘ महत्वाचे होते. इथे ‘ तुम ‘ ची जागा ‘ मी ‘ ने घेतली होती. या ‘ मी ‘ नेच घात केला.
प्रदिर्घ काळपर्यंत सत्ता उपभोगण्याचे सारे प्रयत्न कोसळले. साऱ्या चालबाज्या फसल्या. तंत्र- मंत्र शक्तिहीन ठरले. येतो, येतो
म्हणणारे फडणवीस तब्बल एकशे सहा साथीदारांसह रानोमाळ झाले.
महाराष्ट्राच्या राजकारणात सत्त्तेसाठी २०१९ मध्ये जे जे काही केले गेले ते कधीच घडले नव्हते.
वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील , शरद पवार या महत्वाकांक्षी नेत्यांनीही बडे राजकारण केले. पण जे केले ते आब राखून.
स्वत:ची आणि इतरांचीही प्रतिष्ठा जपून. फडणवीस यांनी मात्र सत्तेचा आणि मुख्यमंत्रीपदाचा पोरखेळ केला. एवढ्यावर ते थांबले असते,
राजकारणातल्या व्यवहार्यता समजून घेतल्या असत्या, शांतपणे विरोधी पक्षनेते म्हणून जबाबदारीने आपली भूमिका वठवली असती तर
पुन्हा उभारी घेण्याची संधी त्यांना होती. पण, एकदा माणसाचा तोल गेला की तो सावरणे कठिण असते असे म्हणतात. तसेच त्यांचेही झाले.
कोविडसारख्या महामारीच्या काळातही त्यांनी राजकारण सोडले नाही. रेमडिसिव्हीरचा साठा करण्यासाठी झालेले भाजपायी प्रयत्न,
त्यात खुद्द फडणवीस यांनी पोलिस ठाण्यात जाऊन केलेला हस्तक्षेप, कोविड स्थितीचे गांभीर्य लक्षात न घेता मंदिरे उघडण्यासाठी केलेले
शंखनाद हे सारे प्रकार म्हणजे राजकारणातील बालिशपण. नंतर खुद्द गडकरी यांनी कोविड काळात राजकारण करू नका असा
जाहीर सल्ला फडणवीसांना दिला. तेंव्हा कुठे ते थोडे वरमले. आजकाल त्यांनी बऱ्यापैकी शांतता ग्रहण केलेली दिसते.असो.
या साऱ्या राजकारणात फडणवीस हे वैयक्तिकदृष्ट्या अपयशी तर ठरलेच. राजकारणात कुणी अपयशी ठरणे हे काही नविन नाही.
पण गमावलेली पत आणि प्रतिष्ठा पुन्हा कमावणे सोपे नाही. फडणवीसांचे राजकारण तर फसलेच. पण, अलिकडच्या काळात त्यांना जी मानखंडना सहन करावी
लागली ती त्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनाही दीर्घ काळपर्यंत विसरता येणार नाही या प्रकारची. फडणवीस हे नाव
आता जनमानसात पूर्वीसारखे आदराने घेतले जात नाही. त्यांचे नाव येताच खिल्ली उडविली जावी असे काहीसे आता झालेले आहे.
बरे, या सगळ्या राजकारणात फडणवीस यांचे वैयक्तिक नुकसान तर झालेच. पण त्याशिवाय त्यांच्या भाजपाचेही कायमचे नुकसान झाले आहे.
साऱ्या देशात भाजपाची लाट असतांना, अजिंक्य मानले जाणारे राजकीय पक्ष धराशायी झालेले असतांना देखील भाजपाला
महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता स्थापन करणे कधीही शक्य झालेले नव्हते. या पुढे ते कसे शक्य होईल ?
खरे म्हणजे, फडणवीस हे विदर्भाचे काय संपूर्ण नागपूराचेही नेते कधीच नव्हते. नागपूरचे महापौर पद एवढाच त्यांचा राजकीय ,
प्रशासकीय अनुभव. पश्चिम नागपूरसारख्या सुरक्षित मतदार संघामुळे विधीमंडळात सातत्याने येणे त्यांना शक्य झाले.
एक अभ्यासू आमदार म्हणून त्यांनी लौकिकही मिळवला. पण हे जे काही त्यांनी मिळवले , ते पाच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाने त्यांच्याकडून अक्षरश: हिसकावून घेतले.
मोदी आणि अमित शहा यांनी गडकरी विरोधाखातर फडणवीस यांना हवा दिली आणि नेतृत्वाचा हा कृत्रिम फुगा हवेतच विरून गेला.
ज्यांच्याकडे काल परवा पर्यंत आशेने- अपेक्षेने पाहिले जात होते, ते फडणवीस यांचे नेतृत्व ऐन तरूणपणी राजकारणाच्या एका तडाख्याने गारद केले.
त्यांचे राजकीय भविष्य फार चांगले असेल असे आता कदाचित त्यांचे समर्थकही म्हणू शकणार नाहीत. एखाद्या उमद्या नेतृत्वाच्या नशिबी असे प्रसंग येऊ नयेत.
पण, फडणवीस यांना अपयशाचे हे घोंगडे अंगावर घेऊनच आता पुढील हिवाळे- पावसाळे पचवावे लागणार आहेत, असेच म्हणावे लागेल.
Postbox India
5 Comments