Shivaji Maharaj – २९ मे १६७४ छत्रपती शिवाजी महाराज
Shivaji Maharaj – मौजीबंधन तुळादान समारंभ
गागाभट्टांनी राज्याभिषेकाची कल्पना मांडली.’ मुसलमान बादशहा तख्ती बैसून, मस्तकावर छत्र धरवून, पातशाही करितात आणि शिवाजीराजे यांनीही चार
पातशाही दबविल्या आणि पावून लाख घोडा ,लष्कर, गडकोट ऐसे असता त्यास तख्त नाही ?’ ही काय गोष्ट आहे ! गेल्या कित्येक शतकात असा पराक्रमी पुरुष झालेला नाही.
याने तर प्राचीन भारतीय थोर राजांच्या तोलाचे कार्य केले .उन्मळून उद्ध्वस्त झालेल्या या देवताभूमीच्या संस्कृतीचा संसार पुन्हा नीटनेटका मांडला.सडे शिंपले,
देवघरात देव मांडले, वृंदावनात तुळस लावली ,गोठ्यात गाय बांधली, नंदादीप लावले ,चार वर्णाची व चार आश्रमाची प्रतिष्ठा वाढविली. कोणावर अन्याय म्हणून ऊरू दिला नाही.
सर्वामुखी मंगल बोलविले. सर्वात मुख्य म्हणजे पारतंत्र्य नष्ट केले. स्वराज्य, धर्मराज्य ,रामराज्य, शिवराज्य निर्माण केले.अन् अशा राजाच्या राजाला सिंहासन नाही ?
छत्र नाही ? केवढी ही उणीव! छत्रसिंहासनाशिवाय राज्याला पूर्णत्व नाही ! shivaji maharaj शिवाजीराजाला राज्याभिषेक झाल्याशिवाय त्याच्या युगप्रवर्तक
कार्याचे महत्त्व जगाला समजणार नाही. राजाच्या मस्तकावर छत्र झळाळलेच पाहिजे. मराठा राजा सिंहासनावर बसलाच पाहिजे!
गागाभट्टांनी ठरवले राजांचा राज्याभिषेक करून घ्यायचा त्याशिवाय त्यांच्या कार्याला पूर्णता नाही ! .संस्काराशिवाय मान्यता नाही!राजा ते तुझे कर्तव्य आहे.
केवढी मोठी आनंदाची गोष्ट होती शिवाजीराजे छत्रपती झालेच पाहिजेत राज्याभिषेकाची ही कल्पना गागाभट्टांनी मांडली. आपले विचार महाराजांना स्पष्ट सांगितले.
राज्याभिषेकाचे महत्व व आवश्यकता पटवून दिली. राज्याभिषेक करून घेतलाच पाहिजे असे आग्रहाने सांगितले. रायगडावर महाराजांना राज्याभिषेक
म्हणजे महाराष्ट्राची भूमी आनंदाने गदगदली ,आणि राज्याभिषेकाची तयारी सुरू झाली.महाराजांचा राज्याभिषेक व्हावयाचा होता. युगायुगानी असा सोन्याचा दिवस उगवला होता.
शाहिरांची प्रतिभा, पंडितांचे शास्त्र, महाराजांचे ध्वेय, आईसाहेबांच्या अपेक्षा ,संतांचे आशीर्वाद, मृत वीरांच्या अतृप्त इच्छा आणि स्वतंत्र महाराष्ट्राचे
आनंदाश्रू राज्याभिषेका दिवशी साकार होणार होते.महाराजांचा राज्याभिषेक म्हणजे महाराष्ट्रभूमीचा लग्नसोहळा. महाराजांचा राज्याभिषेक म्हणजे
महाराष्ट्र भूमीचा लग्नसोहळा. केवढी लगीनघाई गडावर उडाली म्हणून सांगू?
समारंभासाठी अंबार्या, अब्दागिर्या ,पालख्या, मेणे ,शामियाने, नानापरीची थान्ये, धार्मिक विधीसाठी लागणारे हजार प्रकारचे साहित्य ,
सोन्याची मोर्चेले, चौऱ्या, छत्र, सुवर्णाचे कलश ,चांदीचे कलश, पडदे, फराससामान, चिराकदाने,सोन्या चांदीचे चौरंग,चोपदारांचे सुवर्दंदंड, शेले,शालू ,
हिऱ्या-मोत्याचे अलंकार, सुगंधी पदार्थ, पंचारत्या, हत्तीवरच्या नौबती, शुभलक्षणी हत्ती, शुभलक्षणी घोडे ,गाई ,त्यांचे सर्व अलंकार, स्त्रियांची सर्व
सौभाग्य उपायने, खर्चासाठी विपुल द्रव्य, सुवर्णतुलेसाठी सोन्याची राशी, व्याघ्रचर्मे,मृगचर्मे,नक्षत्रमाळा, मोत्याच्या झालरी, विविध धातूंची विविध पात्रे,
हजार प्रकारचे सामान-साहित्य , अगदी दर्भापासून सिंहासनापर्यंत, सुपारीपासून हत्तीपर्यंत आणि हळकुंडापासून होमकुंडापर्यंत झाडून सगळ्या
साहित्याची व साधनांची यादीवार, तपशीलवार तयारी सुरू झाली. एकूण एक मंडळी राज्याभिषेकाच्या तयारीसाठी कामाला लागले होते.
पहिला विधी मौजीबंधन आणि तुला दान समारंभ होणार होता गागाभट्टांनी महाराजांच्या राज्याभिषेकविधीसाठी एक लहानसा ग्रंथच रायगडावर लिहून तयार ठेवला होता.
‘.”राज्याभिषेकप्रयोग “हे या ग्रंथाचे नाव .राज्याभिषेकविधि कसा कसा करावयाचा, कोणकोणते धार्मिक संस्कार व समारंभ करावयाचे
वगैरे गोष्टीची तपशीलवार शास्त्रीय माहिती गागाभट्टांनी अत्यंत दक्षतापूर्वक अभ्यासली होती. त्यानुसार आता धार्मिक विधीस प्रारंभ होणार होता.
रायगडच्या महाद्वारावर तोरण चढले. नगारे ,चौघडे ,शिंगे कडकडू लागले. श्री गणरायाची प्रतिष्ठापना झाली.
तांदुळात कुंकू मिसळले गेले. स्वस्तिक चिन्हे उमटली. गागाभट्टांनी गणरायास आवाहन केले.श्रीमन्महागणाधिपतयेनमः! एकेका विधीस प्रारंभ झाला.
पहिला विधी महाराजांचे मौजीबंधन! महाराजांची मुंज व्हायची राहिली होती, म्हणजे केलेलीच नव्हती! कारण जरी भोसले क्षत्रियकुलोत्पन्न होते.
तरी त्यांची मुंज झाली नव्हती. धार्मिक संस्कार झाले नव्हते.मुंजीशिवाय क्षत्रियाला क्षत्रियत्व प्राप्त होत नाही ,म्हणून राज्याभिषेकापूर्वी महाराजांची मुंज होणे जरूर होते.
गागाभट्टांनी मुंजीची तिथी ज्येष्ठ शुद्ध चतुर्थी ही निश्चित केली होती.मुंजीसाठी देवदेवकाची प्राणप्रतिष्ठा, कुलधर्मकुलाचारादि विधी झाले .
शुद्ध चतुर्थी उजाडली . स्त्रियांची , पाहुण्यांची,शास्रीपंडितांची मंगल वर्दळ सुरू झाली. मुहूर्ताची घटिका घंघाळात हेलावू लागली. हजारो वैदिक ब्राह्मणांच्या,
अग्नीच्या व सूर्याच्या साक्षीने महाराज मुंजीसाठी सिद्ध झाले. मुंजमुलाचे वय यावेळी अवघे ४४ वर्षाचे होते. महाराजांची अगोदरच लग्न झाली होती.
गागाभट्टाने व बाळंभट्टाने सर्व पौरोहित्य केले.वाद्दे दणदणली पंचआरत्या झाल्या. महाराजांच्या गळ्यात यज्ञोपवीत आले.
अग्नीच्या साक्षीने महापवित्र गायत्री मंत्राची महाराजांनी दीक्षा घेतली. shivaji maharaj महाराज संस्कारयुक्त क्षत्रिय झाले.
२९मे १६७४ रोजी महाराजांची मुंज झाली.मुंज झाल्यावर मगच विवाह करावयचा असतो.शास्र हे असे सांगते.गागाभट्टांनी महाराजांना शास्राप्रमाणे आता लग्न करण्याची आज्ञा केली. महाराजांची अगोदरच आठ लग्न झालेली होती. त्यातील काही राण्या हयात होत्या. आता शास्त्राप्रमाणे नवीन लग्न करावयाचे. महाराजांना आता परत लग्न करणे हा मुद्दा मुळीच पटणारा नव्हता.
लग्न झालेल्या या राण्यांशीच महाराजांची पुन्हा लग्ने लावावीत! शास्त्राला ते मंजूर होते! आणि महाराजांची लग्न ठरली ! म्हणजे मुंजीच्या दुसऱ्या दिवशी सौ.सोयराबाई राणीसाहेबांचा महाराजांशी समंत्रक विवाह झाला. लग्नात थाट – समारंभ मात्र मुळीच करण्यात आला नाही. नंतर सौ.सकवारबाईसाहेब,सौ. पुतळाबाई साहेब यांचीहि महाराजांशी लग्ने करण्यात आली. अशा प्रकारे २९ मे १६७४ या दिवशी महाराजांची समंत्रक मुंज पार पडली.
एकेका दिवशी एकेक विधी होत होते ॠत्विजवर्णन – पुण्याहवाचनपूर्वक यज्ञास प्रारंभ करून विनायकशांती करण्यात आली. नक्षत्रशांती, ग्रहशांति,ऐंद्रियशांती ,पौरांदरीशांति वगैरे विधि पार पडले होते. shivaji maharaj महाराज या काळात व्रतस्थ होते. दुग्धपान व फलाहार करुन ते अतिशय श्रद्धेने प्रत्येक धार्मिक विधी यथासांग पार पाडीत होते.
नंतर महाराजांची सुवर्णतुला व इतर अनेक प्रकारच्या तुला करण्याचे ठरले होते. १६ महादानांपैकी तुळादान हे एक दान हे आहे. या दिवशी महाराजांची सुवर्णतुला करण्यात आली. तराजूच्या एका पारड्यात महाराज बसले दुसऱ्यात सोन्याचे होन घालण्यात येत होते. ब्राह्मण मंत्र म्हणत होते. पारडी समभार झाली. महाराजांची तुळा झाली. एकूण 17 हजार होन लागले .म्हणजे महाराजांचे वजन पक्के २मण होते.( १६० पौंड) होते. या पारड्यात महाराजांनी होनांची बरीच मोठी जादा रक्कम ओतली. व या सर्व धनाचा दानधर्म केला .सोने, चांदी ,तांबे ,कापूर ,साखर, लोणी ,फळे ,मसाले वगैरे अनेक पदार्थांनी महाराजांची तुला करण्यात आली व ते सर्व पदार्थ दान करण्यात आले.
लेखन
डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर
(इतिहास अभ्यासक)
संदर्भ
राजा शिवछत्रपती
बाबासाहेब पुरंदरे
मराठी रियासत
गो.स.सरदेसाई
करवीर रियासत
स.मा.गर्गे
4 Comments