r r patil – कै.श्री. श्री. रावसाहेब रामराव पाटील – आर.आर.आबांना
r r patil – कै.श्री. श्री. रावसाहेब रामराव पाटील – आर.आर.आबांना विनम्र अभिवादन
श्री. रावसाहेब रामराव पाटील उर्फ आर आर पाटील यांचा जन्म १६ ऑगस्ट १९५७ रोजी अंजनी, तालुका तासगाव ,जिल्हा सांगली येथे झाला. महाराष्ट्रातील राजकारणी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य ,महाराष्ट्र विधानसभा सदस्य व महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री म्हणून ते कार्यरत होते. लोकांमध्ये स्वच्छ चारित्र्याचे व प्रामाणिक नेते म्हणून ते प्रसिद्ध होते. सत्तेत उच्चपदावर असतानाही आपल्या मातीशी कायम घट्ट नाळ जोडणारा प्रामाणिक असा हा नेता होता. आर. आर. पाटलांनी कमवा आणि शिका हा मंत्र जपत श्रमदान करीत शिक्षण घेतले. शाळकरी वयातच प्राचार्य पी.बी. पाटील यांचे मार्गदर्शन आबांना मिळाले. पुढे सांगलीतल्या शांतिनिकेतन महाविद्यालयातून बी.ए. झाले .पुढे एल.एल.बी. झाले. गरीब शेतकरी कुटुंबातल्या या होतकरू तरुणांचे नेतृत्व गुण सुरुवातीला हेरले ते कै.वसंतदादा पाटलांनी. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसतानाही मनाला भिडणारी भाषण शैली ,स्वच्छ प्रतिमा, आणि समाजासाठी काही करण्याची जिद्द यांच्या जोरावर कै. आर .आर .पाटलांनी राजकारणात वाटचाल सुरू केली. वसंत दादा पाटील यांच्या बरोबरच यशवंतराव चव्हाण यांची ही प्रेरणा आर .आर .पाटील यांना होती. अभ्यासू आणि स्वच्छ आमदार अशी स्वतःची ओळख त्यांनी निर्माण केली होती. नंतर माननीय शरद पवारांसोबत आबांनी काँग्रेस पक्ष सोडत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आर.आर.पाटील हे १९९५ साली काँग्रेसच्या तिकिटावर दुसऱ्यांदा आमदार झाले तेव्हा भाजप शिवसेनेचे युती सरकार सत्तेत होते. राजकीय आयुधांचा वापर करत आबांनी त्यावेळी विधानसभा दणाणून सोडली,आणि सत्ताधारी भाजप शिवसेनेला कोंडीत पकडले . त्यामुळे अभ्यासू आणि स्वच्छ आमदार अशी सार्थ ओळख आबांची निर्माण झाली. याच काळात श्री.शरद पवार साहेब यांचे विश्वासू आणि कट्टर समर्थक अशी r r patil आर. आर. पाटलांची ओळख निर्माण झाली. आर. आर. पाटील यांना काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारमध्ये सुरुवातीला ग्रामविकास मंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली होती .संत गाडगे महाराज स्वच्छता अभियान यशस्वीपणे राबवून आर. आर. पाटील यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली .महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री असताना आबांनी डान्स बार बंद करण्याचा क्रांतिकारी निर्णय घेऊन अनेकांचे संसार सावरले. डान्स बार बंद करण्याच्या निर्णयाला सर्वच क्षेत्रातून पुष्कळ विरोध झाला ,पण त्यावर आबा ठाम राहिले. गृह मंत्रिपदाच्या काळात त्यांनी राबवलेले महात्मा गांधी तंटामुक्त अभियान हे अभिनव होते. संत गाडगे बाबा, महात्मा गांधी, यशवंतराव चव्हाण त्यांच्यापासून प्रेरणा घेत गरीब शेतकरी कुटुंबातले आर. आर. पाटील सत्तेच्या राजकारणात राहूनही साधेच राहिले. साधेपणा हे त्यांचे वैशिष्ट्य होते. याच साधेपणातून ते तळागाळातल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत असत. सत्ता येते आणि जाते पण सोबत राहतात ती जोडलेली माणसे हे तत्व आर. आर. आबा यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांनी समर्थपणे सांभाळली .कार्यकर्त्यांशी संवाद साधत पक्ष वाढवला. आर.आर.पाटलांना लोक प्रेमाने आबा म्हणत .. तीच त्यांची खरी ओळख.आबा अखेरपर्यंत आबाच राहिले त्यांनी आपला आबासाहेब होऊ दिला नाही, हेच त्यांचे वेगळेपण होते. जिल्हा परिषद सदस्य ,सहा वेळा आमदार, ग्राम विकास मंत्री, गृहमंत्री, उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ,असा सत्तेचा प्रवास करूनही आबा शेवटपर्यंत आबाच राहिले. आबा सत्तेची एकेक पायरी चढत गेले पण कुटुंबात आणि जनमानसात शेवटपर्यंत आबांनी आपला साधेपणा टिकवून ठेवला. सत्तेच्या खुर्चीत बसूनही साधेपणाने आपले व्यक्तिमत्व घडवणारा हा वेगळा राजकारणी होता. महाराष्ट्राला या राजकारण्यांकडून मोठी अपेक्षा होती. समाजासाठी अजून खूप काही करण्यापूर्वीच मृत्यूने r r patil आर. आर. पाटील यांना गाठले ,आणि एका समंजस नेतृत्वाचा अस्त झाला.
1 Comment