Sundarlal Bahuguna -हिमालय पोरका झाला
Sundarlal Bahuguna – सुनील तांबे
2/6/2021,
सुंदरलाल बहुगणा Sundarlal Bahuguna यांचं कोविडमुळे वयाच्या ९४ वर्षी निधन झालं. उत्तराखंडातील चिपको आंदोलन आणि
टेहरी धरणाच्या विरोधात त्यांनी केलेलं आंदोलन यामुळे ते कायम स्मरणात राहातील.
९ जानेवारी १९२७ रोजी सुंदरलाल बहुगुणा यांचा जन्म झाला. म. गांधीजींच्या नेतृत्वाखालील स्वातंत्र्य आंदोलनात ते सहभागी झाले होते.
उत्तराखंडातील अस्पृश्यतेच्या विरोधात त्यांनी लढा दिला होता. विवाहानंतर खेड्यामध्ये आश्रम स्थापन करून राह्यचं या अटीवर त्यांनी
विमला यांच्याशी विवाह केला. १९६५ ते १९७० उत्तराखंडात महिलांनी उभ्या केलेल्या दारू हटाव मोहिमेचे ते प्रणेते होते. हिमालयातील
महाकाय विकास प्रकल्पांमुळे होणारी निसर्ग आणि समाजजीवनाच्या हानीची पाहणी करण्यासाठी १९८१ ते १९८३ या काळात
त्यांनी सुमारे पाच हजार किलोमीटर्सची पदयात्रा केली. या यात्रेला देशात आणि देशाबाहेर मोठा प्रतिसाद मिळाला. तत्कालीन पंतप्रधान,
श्रीमती इंदिरा गांधी यांनी उत्तराखंडातील वृक्षतोडीवर १५ वर्षांची बंदी घालण्याची घोषणा केली.
पाश्चात्य देशांमधील आधुनिक पर्यावरण चळवळीचा आरंभ राचेल कार्सन यांच्या सायलेंट स्प्रिंग या पुस्तकाने झाला. हे पुस्तक १९६२ साली प्रकाशित झालं.
या पुस्तकाच्या प्रेरणेने उभ्या राह्यलेल्या पर्यावरण रक्षणाच्या आंदोलकांचा पर्यावरणाशी, निसर्गाशी जैव संबंध नव्हता.
१९७० च्या दशकात उभं राह्यलेलं चिपको आंदोलन पूर्णपणे वेगळं होतं. निसर्ग आणि पर्यावरण यांच्यावर आमचं जीवन अवलंबून आहे
म्हणून झाडं तोडायची असतील तर प्रथम आमच्यावर कुर्हाड चालवा असा अभिनव अहिंसक कार्यक्रम चिपको आंदोलनाने दिला.
‘इकॉलॉजी इज पर्मनंट इकॉनॉमी’ या चार शब्दांत आंदोलनाचं मर्म पकडणारी घोषणा,Sundarlal Bahuguna सुंदरलाल बहुगुणा यांनी दिली.
या आंदोलनात ग्रामीण भागातील महिला आघाडीवर होत्या. या सर्व कारणांमुळे जगाचं लक्ष या आंदोलनाकडे वेधलं गेलं.
पर्यावरण, वनसंवर्धन, स्थानिक समूहांचे हक्क वा अधिकार, पर्यायी विकासनीती असे अनेक धोरणात्मक विषय या आंदोलनामुळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरांवर चर्चेचे बनले.
हिमालयाची पर्वतरांग काश्मीरपासून अरुणाचल प्रदेशापर्यंत आहे. भारतीय भूखंड युरेशियाच्या भूखंडाच्या खाली सरकत असल्याने
जगातील उत्तुंग पर्वतरांग निर्माण झाली. त्यामुळे तिबेटचं पठार वर उचललं गेलं. लाखो वर्षं सुरु असलेल्या या प्रक्रियेमुळे सिंधू, गंगा आणि ब्रह्मपुत्रा
या तीन प्रमुख नद्या व त्यांच्या उपनद्या निर्माण झाल्या. हजारो वर्षं त्यांनी वाहून आणलेल्या गाळामुळे पंजाब, सिंध, उत्तर प्रदेश, बिहार, बंगाल
येथील सुपीक गाळाची जमीन निर्माण झाली. आजही भारतीय भूखंड युरेशियाच्या खाली घुसतो आहे. त्यामुळे हिमालयाची उंची वाढत आहे.
या कारणामुळे संपूर्ण हिमालय हे भूकंप प्रवण क्षेत्र आहे. भूकंप, बर्फाची वादळं, भूस्खलन, मातीची धूप, जंगलात लागणारे वणवे,
पूर ही या प्रक्रियेची दृश्य रुपं आहेत. यापैकी भूंकप वगळता इतर सर्व परिणामांना आधुनिक विकासाचा कार्यक्रम जबाबदार आहे.
जंगलतोड, रस्ते, धरणं, बंधारे, बोगदे, जलविद्युत प्रकल्पांमुळे हिमालयातील पर्यावरणाचा समतोल वेगाने ढासळतो आहे.
७ फेब्रुवारी २०२१ रोजी नंदादेवी पर्वतावरून बर्फ, गोठलेला चिखल आणि दगड यांचा प्रचंड मोठा तुकडा सुमारे पाच हजार मीटर्स खाली कोसळला.
त्यामुळे ऋषी गंगेची उपनदी असलेल्या नदीत कृत्रिम तलाव निर्माण झाला. हा तलाव फुटल्याने उत्तराखंडातील गावांमध्ये पूर आला.
त्यामुळे एक विद्युत निर्मिती प्रकल्पही वाहून गेला. चिपको आंदोलनाच्या नेत्या गौरादेवी, यांचं गावही या पुरात वाहून गेलं.
या पुराने झालेली जिवीतवित्तहानी प्रचंड आहे. सरकारी आकडेवारीनुसार सुमारे ४,००० कोटीचं नुकसान झालं.
चिपको आंदोलनाची सुरुवात २६ मार्च १९७४ रोजी झाली. चंडीप्रसाद भट यांच्या नेतृत्वाखालील दशौली ग्राम स्वराज्य मंडळाने या आंदोलनाचा पाया घातला.
हे आंदोलन अलकनंदा नदीच्या परिसरात उभं राह्यलं. सुंदरलाल बहुगुणा यांनी टिहरी-गढवाल म्हणजे भागीरथीच्या परिसरात
या आंदोलनाचा झेंडा १९७६ साली हाती घेतला. उत्तराखंड संघर्ष वाहिनी हा या आंदोलनातला तिसरा प्रभावी गट होता.
दुर्दैवाने या तिन्ही गटांमध्ये वैमनस्य निर्माण झालं. त्यामुळे उत्तराखंड राज्याच्या मागणीच्या आंदोलनात यापैकी एकही गट अग्रभागी नव्हता.
साहजिकच विकासाला नवी दिशा देण्यासाठी आवश्यक असणारं राजकारण उभं राह्यलं नाही. परिणामी उत्तराखंड राज्याच्या
निर्मितीनंतर हिमालयाच्या पर्यावरणाला सुरुंग लावणार्या प्रकल्पांची संख्या आणि गती वाढत गेलेली दिसते.
आज विज्ञान आणि तंत्रज्ञान कमालीचं प्रगत झालं आहे आणि जग हवामान बदलाच्या संकटाचा सामना करत आहे.
जागतिक तापमान वाढीमुळे हा हवामान बदल होतो आहे. हिमालयाच्या पर्वतरांगेमध्येही त्यामुळे तापमानात वाढ झाली आहे.
गेल्या वर्षीच्या हिवाळ्यात तिथे बर्फवृष्टी कमी झाली. हिवाळ्यामध्ये जंगलांमध्ये वणवे पेटणं हे तापमान वाढीचं लक्षण आहे.
सूर्यापासून येणारी काही ऊर्जा जमीन व समुद्राच्या पाण्यात शोषली जाते आणि उर्वरित ऊर्जा अंतराळात फेकली जाते.
पृथ्वीच्या वातावरणातील कार्बनडाय ऑक्साईड व अन्य वायूंचं प्रमाण वाढल्याने सूर्याची ऊर्जा अंतराळात फेकली जाण्याला अटकाव निर्माण झालाय,
त्यामुळे जगाचं तापमान वाढतं आहे. औद्योगिक विकासामुळे ही समस्या उद्भवली आहे. ही बाब वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध केली पॉल क्रुटझन,
मारियो मोलिना आणि एफ. शेरवुड रोलँण्ड या शास्त्रज्ञांनी. त्यासाठी या तिघांना १९९५ साली नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
नोबेल पुरस्काराचा स्वीकार करताना एफ. शेरवुड रोलँण्ड या शास्त्रज्ञाने आपल्या भाषणात म्हटलं,
“what’s the use of having developed a science well enough to make predictions if, in the end,
all we are willing to do is stand around and wait for the them to come true?”
(विज्ञानाची प्रगती एवढी झाली आहे की आपण भविष्याबद्दल अचूक भाकीत करू शकतो, परंतु आपण ती
भाकीतं खरी होण्याचीच वाट पाहाणार असू तर त्याचा काय उपयोग आहे?)
चिपको आंदोलन ७० च्या दशकात झालं. हवामान बदल वा जागतिक तापमानवाढीमुळे ओझोनच्या थराला पडलेल्या
छिद्राच्या संशोधनाबद्दल १९९५ साली नोबेल पुरस्कार देण्यात आला.
२००८ साली Sundarlal Bahuguna सुंदरलाल बहुगुण यांना पद्मविभूषण किताब देण्यात आला. मात्र आपण प्रस्थापित
विनाशकारी विकासाचा पुनर्विचार करायला तयार नाही. शाश्वत विकासाचा मार्ग शोधण्याचीही आपली इच्छा नाही.
परिणामी उंची वाढूनही हिमालयाचं भवितव्य अंधकारमय आहे. सुंदरलाल बहुगुणा यांच्या निधनाचं दुःख सोसण्याची शक्ती हिमालयाला मिळावी, ही प्रार्थना.