The print Hindi – योगेंद्र यादव यांच्या द प्रिंट मधील लेखाचा अनुवाद
The print Hindi – भाषांतर : अनंत घोटगाळकर
मोदी म्हणजे मनमोहन सिंग नव्हेत. ते शेवटपर्यंत सत्ता सोडणार नाहीत
{ मोदींचा शपथविधी झाल्यापासूनच्या सात वर्षांच्या कालावधीत त्यांचे सरकार आजच्याइतके डळमळीत कधीच दिसले नव्हते.
तथापि आजही काही पर्याय समोर येताना दिसत नाही.}
~ योगेंद्र यादव
आज मोदी सरकारला सात वर्षे पूर्ण झाल्याच्या मुहूर्तावर किसान आंदोलनाने पुकारलेला काळी निशाणे दाखवण्याचा कार्यक्रम देशात
राजकीय पर्याय निर्माण होण्याची आवश्यकता व्यक्त करतो. असा पर्याय कसा निर्माण होऊ शकेल याचेही काही संकेत आपल्याला या कार्यक्रमातून मिळतात.
नरेंद्र मोदी यांनी प्रथम शपथ घेतली तेव्हापासून त्यांचे सरकार आजच्याइतके डळमळीत झाल्याचे कधीच दिसले नव्हते. त्याच्या सामर्थ्याचे वलय
आता विरु लागलेय. कोविड महामारीच्या दुसऱ्या लाटेतील अपुऱ्या रुग्णचाचण्या, मृतांच्या घोषित संख्येतील लपवाछपवी, पूर्वतयारीचा अभाव,
ऑक्सिजनची कमतरता, लशीकरणातील गोंधळ अशा गलथान हाताळणीमुळे सरकारच्या असंवेदनशीलतेने आता क्रौर्याची पातळी गाठली आहे
ही गोष्ट मोदींबद्दल साशंक असणाऱ्यांना तर स्पष्ट दिसत आहे. परंतु सरकारचे अस्तित्वच या आणीबाणीच्या प्रसंगी कुठे न दिसल्यामुळे
मोदींवर दृढविश्वास असलेल्यांनाही पंतप्रधानांभोवती असलेल्या सर्वशक्तिमानतेच्या मिथकातील हवा निघून गेल्यासारखे वाटत आहे.
परिस्थितीवर पंतप्रधानांचे पुरेसे नियंत्रण नाही, ते काही दिसतात तेव्हढे शक्तिशाली नाहीत अशी शंका आता त्यांच्याही मनात येऊ लागलेली आहे.
‘सर्वशक्तिमान पंतप्रधान’ ही कष्टपूर्वक तयार केलेली प्रतिमा राजकीय आखाड्यातही आता निष्प्रभ ठरत आहे. प्रखर निर्धार असलेला
एक लहानसा समूहसुद्धा या सरकारला नेटाने तोंड देऊ शकतो ही गोष्ट नागरिकत्व सुधारणा कायद्याविरुद्धच्या निदर्शनांनी दाखवून दिली.
या सरकारला चार पावले मागे रेटता येते ही गोष्ट किसान आंदोलनाने एव्हाना दाखवून दिलेलीच आहे. पंतप्रधान आणि त्यांच्या पक्षाच्या
निवडणूकीतील अजेय सामर्थ्यासमोर बंगालने यशस्वी आव्हान उभे केले आहे. सात वर्षे निरंकुश सत्ता राबविल्यानंतर आज मोदी
सरकारला सर्वच हुकूमशाही राजवटींना जावे लागते त्या सत्याला सामोरे जावे लागत आहे : सत्ता कोसळते आणि सर्वंकष सत्ता सटासट कोसळते. The print Hindi
मोदींवर नुसती टीकेची झोड उठवल्याने त्यांचा पराभव होणार नाही
आज मोदी सरकारची अवस्था मनमोहन सरकारच्या दुसऱ्या पर्वासारखीच दिसत आहे. त्या सरकारची घडी भरण्याची सुरुवात 2012 सालीच झाली होती.
वरवर पाहता आज असे वाटेल की पंतप्रधानांची जादू ओसरलेली आहे, आपल्या चुका आणि आपली दुष्कृत्यें झाकण्यासाठी या सरकारने
असत्यांचा जो डोलारा उभा केला आहे त्याच्याच वजनाने ते खाली कोसळेल. विरोधी पक्षांनी फक्त धीराने वाट पाहिली पाहिजे. फार तर एकत्र आले पाहिजे.
मग सारे आपोआप होईल.
परंतु असे वाटण्यातच खरा धोका आहे. मोदींच्या अस्ताला सुरुवात झालेलीच आहे असे गृहीत धरणे, लोकशाहीची अंगभूत दोषनिवारक
यंत्रणा या सरकारच्या अतिरेकाला आळा घालेल, घटिते स्वतःच आपणा सर्वांचे काम करतील असे समजणे यातच खरा धोका आहे.
याहून मोठा भ्रम दुसरा नसेल. या क्षणी जनतेतील मोदी सरकार विरुद्धचा असंतोष आपल्याला आहे त्यापेक्षा मोठा दिसत असण्याची शक्यता आहे.
त्यांचा सुरक्षित जनाधार आपण कमी लेखत असण्याची शक्यता आहे. आज सर्वत्र मोदीसरकारविरुद्ध असमाधान,
अपेक्षाभंग आणि अप्रीती आहे हे खरे पण म्हणून लोक बहुसंख्येने त्यांना पूर्णतः नाकारतीलच असे नव्हे.
कारभार कसाही असला तरी विद्यमान सरकारच्याच बाजूने राहणारे खूप लोक असतात. इतर काही लोकांचा अपेक्षाभंग झालेला असला
तरी त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत या सरकारला खाली खेचलेच पाहिजे अशी तीव्र तिडीक त्यांच्या मनात कदाचित निर्माण होणारही नाही.
सगळे विरोधी नेते हातात हात घालून उभे आहेत या दृश्यानेच केवळ मतदार मुळीच हुरळून जाणार नाहीत. उलट एका माणसाच्या विरोधात
एक टोळी एकवटली आहे हा त्यांचा समज या दृश्याने पक्का होण्याचीही शक्यता आहे. शिवाय मोदी सरकार प्रतिहल्ला करत येईलच.
प्रस्थापित सत्तेच्या आज्ञेबरहुकूम चालणाऱ्या प्रचाराचे सामर्थ्य नीट न जोखण्याची चूक या घडीला आपल्या हातून होऊ शकते.
या प्रचाराचे प्रणेते अंगावर आलेले वादळ शमण्याची वाट पहात आहेत. ते शमले की सगळ्या दोषाचे खापर कोणा तिसऱ्याच्याच
माथ्यावर फोडून लोकांचे लक्ष विचलित करत त्यांच्या रोषाला तोंड देण्याची वेळ पुढे ढकलण्याचा त्यांचा नेहमीचाच खेळ ते पुन्हा सुरु करतील.
सरकारला आव्हान देणाऱ्या व्यक्ती आणि संघटनांवर विधिनिषेधशून्य हल्ला चढवण्यासाठी योग्य अशा संधीची हे लोक वाटच पहात आहेत.
पैसा , माध्यमें आणि संघटनात्मक यंत्रणेच्या बळावर त्यांची रचिते सर्वत्र प्रसृत केली जातील. एक गोष्ट नक्की. मोदी म्हणजे मनमोहनसिंग नव्हेत.
आपल्या अखत्यारीतील भलीबुरी, न्याय्य- अन्याय्य अशी सगळीच्या सगळी साधने पुरेपूर वापरत अगदी शेवटपर्यंत मोदी डाव सोडणार नाहीत. The print Hindi
एक गोष्ट अगदी स्पष्ट आहे. मोदींवर नुसती टीकेची झोड उठवल्याने त्यांचा पराभव मुळीच होणार नाही. आहे त्याला हाकलण्यापूर्वी त्याला पर्याय कोणता आहे
याचा लोक विचार करतात. आणि आपण हे कबूल केले पाहिजे की असा पर्याय आज समोर दिसत नाही. निदान सर्वसामान्य माणसाच्या
नजरेच्या टप्प्यात असा पर्याय त्याला आढळत नाही. यात आजच्या साऱ्या विरोधी पक्षांना कमी लेखण्याचा किंवा त्यांच्या एकीची
आवश्यकता नाकारण्याचा हेतू नाही. विरोधकांचे ऐक्य आवश्यक आहेच पण ते पुरेसे मात्र नाही.
सर्वांना एकत्र ठेवू शकेल असा एक बळकट धागा आणि लोकांच्या मनात आशा जागवू शकेल अशी तेजस्वी प्रभा ही आज विरोधी पक्षांची खरी गरज आहे.
आज मितीला या दोन्हीपैकी एकही गोष्ट त्यांच्याकडे दिसत नाही. आणि म्हणून या साऱ्या विरोधी पक्षांना पूरक ठरू शकेल अशा एका पर्यायाची आपल्याला आज आवश्यकता आहे.
मोदींना असा पर्याय निर्माण व्हायचा तर त्याने भारताच्या भविष्यासाठीचा सकारात्मक आणि विश्वासार्ह असा संदेश द्यायला हवा.
भूतकाळातील चुकांची उजळणी ऐकण्यात लोकांना एका मर्यादेपलीकडे रस नसतो. आता यापुढे कोणती सुधारणा होणार हे त्यांना जाणून घ्यायचे असते.
आता मात्र खोटीखोटी स्वप्ने आणि जुमले चालणार नाहीत. एकदा अशा जुमल्यांना बळी पडलेल्या लोकांना आता ठोस, विश्वसनीय असे काही हवे आहे.
ही योजना सर्वस्पर्शी, साधीसोपी आणि विश्वास जागवणारी हवी. आज लोकांसमोर असा काही संदेश ठेवला गेलेला दिसत नाही.
विसाव्या शतकातील विचारधारांतून त्याची निर्मिती करता येणार नाही. गतकाळातील जुन्या विचारधारांची झिजलेली भाषा आजच्या भारतात चालत नाही.
नवनव्या कल्पना, ध्येयधोरणे आणि भूमिका यांच्या अद्यावत संयोगातून नवा संदेश आकारायला हवा.
असा सकारात्मक आणि विश्वासार्ह संदेश निर्माण केल्यावर तो लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विश्वासार्ह असे संदेशवाहक आपल्याला लागतील.
त्यांच्या शब्दाला सर्वसामान्य राजकारण्यांपेक्षा जास्त वजन असावे लागेल. विरोधी पक्षात आज अशा लोकांची कमतरता आहे.
आज काही आपल्यात एखादा जयप्रकाश नारायण नाही. तथापि निःस्वार्थी समाजसेवेची निष्कलंक पार्श्वभूमी असलेले प्रामाणिक
आणि प्रतिभावान नेते भारताच्या सार्वजनिक जीवनात नाहीतच असे नाही. हे ऐतिहासिक आव्हान पेलण्यासाठी त्यांच्यापैकी काहींनी आता पुढे आले पाहिजे.
आणि शेवटची गोष्ट म्हणजे हा संदेश देशभर सर्वत्र पोहोचवण्यासाठी आपल्याला एक यंत्रणा लागेल. या यंत्रणेचे दोन भाग असावे लागतील.
संघटना आणि संपर्क. या दोन्ही बाबतीत भाजपला तोडीस तोड ठरेल असे काहीही आज विरोधी पक्षांच्या हाती नाही.
अनेक विरोधी पक्षांकडे कार्यकर्त्यांची फौज आहे यात शंका नाही. त्यामुळे पर्याय उभा करायचा तर आजच्या विरोधी पक्षांना या कामात सहभागी करून घेणे आवश्यकच आहे.
पण ते पुरेसे मात्र नाही. नवा पर्याय निर्माण करायचा तर आजवर राजकीय परिक्षेत्राच्या बाहेर राहिलेल्या नागरिकांना ,
मुख्यत्वेकरून त्यांच्यातील तरुणांना मोठ्या प्रमाणात संघटित करायला हवे. आजचे आव्हान पेलण्यासाठी आपल्या राजकीय जीवनात हा
नवा उसळता प्रवाह आणण्याची नितांत आवश्यकता आहे. लोकांच्यात प्रत्यक्ष काम करणाऱ्या संघटनेला पूरक म्हणून
भाजपच्या तोडीच्या आय. टी. टीमचा समावेश असलेली संदेशवहन यंत्रणा आपल्याला उभारावी लागेल. आर. एस. एस.-
भाजपच्या ट्रोलसेनेला तोंड देण्यासाठी एका सत्यसेनेची भारताला गरज आहे.
भारत नावाच्या कल्पनेवर ज्यांचा विश्वास आहे, आपल्या घटनात्मक मूल्यांवर ज्यांची श्रद्धा आहे, लोकशाहीचा ऱ्हास पाहून ज्यांच्या मनीं निराशा दाटून येते
आणि आपल्या प्रजासत्ताकाच्या पुनर्बांधणीला जे बांधील आहेत त्या सर्वांच्या दृष्टीने अशा सकारात्मक आणि व्यवहार्य पर्यायाची उभारणी हे
अत्यंत निकडीचे राजकीय कर्तव्य आहे.The print Hindi
आपल्या काळाच्या या आवाहनाला कोणी प्रतिसाद देईल का? देणार असेल तर ही प्रक्रिया कशी आकाराला येईल? या प्रश्नांची उत्तरे आज आपल्याजवळ नाहीत.
पण आजची निदर्शने आपल्याला मार्ग दाखवतात. किसान आंदोलनाने याबाबत पुढाकार घेतला आहे. राजकीय पक्षांनी
आपला पाठींबा घोषित करण्यापूर्वीच कामगार संघटना आणि इतर संघटना आंदोलनाच्या मागोमाग येत आहेत. हेच भविष्यकालीन प्रारूप असेल काय?
(योगेंद्र यादव हे स्वराज इंडिया चे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. यात व्यक्त झालेली मते ही त्यांची वैयक्तिक मते आहेत.)
1 Comment