- रावबहादूर महादेव विश्वनाथ धुरंधर
रावबहादूर महादेव विश्वनाथ धुरंधर
सिद्धहस्त चित्रकार पोर्ट्रेट पोस्टर्स, पुस्तक-चित्रे,लँडस्केप्स, कलेवरील साहित्य आणि कृष्णधवल रेखाचित्रे यासारख्या चित्रकलेच्या नानाविध प्रकारामधे योगदान देणारे
धुरंधर हे २० व्या शतकाच्या पूर्वार्धातील मुंबईतील एक महान चित्रकार होते. त्यांचा जन्म मुंबई तील फणसवाडी येथे त्यांच्या आजोळी १८ मार्च १८६७ रोजी झाला.त्यांचे पालनपोषण शालेय शिक्षण राजाराम हायस्कूलमध्ये कोल्हापुरात झाले. तेथून त्यांनी चांगल्या गुणांसह इंटरमिजिएट परीक्षा दिली. लहानपणापासूनच त्यांना चित्रकलेची उत्तम जाण होती.त्यांनी हायस्कूलच्या प्रदर्शनात त्याच्या रेखाचित्रे आणि चित्रांसाठी अनेक बक्षिसे मिळविली होती. चित्रकार आबालाल रहिमन यांची निसर्गचित्रे पाहून, ते देखील मोहित झाले. आबालाल यांनी त्यांना चित्र काढणे आणि वॉटर कलररिंगच्या काही महत्त्वाच्या टिप्स दिल्या. मॅट्रिकची परीक्षा देण्यासाठी ते मुंबईत आले आणि त्यानंतर त्यांना सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट मधे कलेच्या उच्च शिक्षणाची संधी मिळाली.
जे जे आर्ट स्कूलमध्ये ते कायम पहिलेच राहिले, आणि सर्वोत्कृष्ट चित्रासाठी त्यांनी अनेक बक्षिसे मिळवली. तसेच शिष्यवृत्ती मिळवली.वर्ष १८९२ मध्ये त्यांनी स्वयंपाकघरातील कामात व्यस्त असलेल्या महाराष्ट्रीयन स्त्रिया दर्शविलेल्या रेखाचित्रासाठी सर्वोत्कृष्ट कृष्णधवल चित्राचा पुरस्कार जिंकला. हे चित्र आता औंध संग्रहालयात जतन करण्यात आले आहे. धुरंधर रविवर्मा यांचे चहाते होते. त्यामुळे धार्मिक वृत्तीने त्यांनी देवी-देवतांचे विषय आणि ऐतिहासिक चित्रेही रंगवायला सुरुवात केली.तसेच समाजाची सद्यस्थिती, आजूबाजूची माणसे आणि त्यांची राहणीमान, त्यांचे साजरे केलेले विधी, सण असे विषयांचे प्रतिबिंब त्यांच्या चित्रात दिसू लागले. त्यांनी वेगवेगळ्या प्रदर्शनांमध्ये ५ सुवर्णपदके जिंकली. लंडनमधे जेजे मधील सोलोमन सरांच्या विद्यार्थ्यांच्या चित्रांचे प्रदर्शन भरवले होते.त्यामधे धुरंधर यांनी काढलेल्या चित्रांपैकी “स्त्रीधनम् अध्यागणी” हे चित्र ठेवण्यात आले होते. इंग्लडची राणी मेरीने ते पेंटिंग विकत घेतले.
त्यांनी आपल्या बापूबाई आणि गंगूबाई या दोन पत्नींच्या स्केचेसचा आणखी एक अल्बम तयार केला. लग्नानंतर दीड वर्षांनी पहिल्या पत्नीचे प्लेगमुळे निधन झाले. दुसरे पत्नीने त्यांना अखेर पर्यंत साथ दिली. बॉम्बे आर्ट सोसायटीच्या प्रदर्शनात त्यांच्या ‘कैकेयी’या चित्राला महाराजा भावनगरच्या सर्वोत्कृष्ट वॉटर कलरचे प्रतिष्ठेचे पारितोषिकही मिळाले. त्यांचे “ग्लोरी ऑफ पंढरपूर” हे चित्र वेम्बली प्रदर्शनात ‘इंडियन रूम’ मध्ये प्रदर्शित करण्यात आले, लंडन येथे “ब्रिटिश एम्पायर रिव्ह्यू “या वृत्तपत्रानेही त्यांचे मनापासून कौतुक केले. त्यांनी ‘सुवर्णमाला’ या मासिकासाठी १९०१ ते १९१४ या कालावधीमधे ‘रामायण’, ‘महाभारत’, ‘भागवत’, ‘भगवद्गीता’, ‘गणेश पुराण’, ‘शिव पुराण’, ‘विष्णू पुराण’ व ‘गीतगोविंद’ या विषयांवररीलप्रसंगांची चित्रे काढली होती.
वर्ष १८९६ मध्ये त्यांची जे.जे. स्कूलचे हंगामी संचालक म्हणून नेमणूक झाली. कालांतराने त्यांची इन्स्पेक्टर ऑफ ड्रॉइंग या मानाच्या जागेवर नेमणूक झाली. रावबहादूर ही पदवी मिळवणारे ते पहिलेच भारतीय चित्रकार ठरले. धुरंधर वर्ष १९३१ मध्ये जे.जे.मधून निवृत्त झाले. त्यांनी जे.जे स्कूल ऑफ आर्टच्या आठवणींवर ” कला मंदिरातील ४१ वर्षे” हे पुस्तक लिहिले आहे.त्यांचे १ जून. १९४४ रोजी मुंबई येथे निधन झाले.
माधव विद्वांस