दि.४ सप्टेंबर १८२५ या दिवशी दादाभाई नवरोजी यांचा जन्म मुंबई येथे झाला.
जुन्या पिढीतील काही माणसे विलक्षण होती हे खरे आहे .आपल्या व्यक्तिगत गरजा मर्यादित ठेवून एखाद्या कार्याचा ध्यास घेऊन प्रयत्नाचे पर्वत उभे करणे हे
भूतकाळात काही पुरुषोत्तमांना शक्य झाले .याचेच एक उत्तम उदाहरण म्हणजे दादाभाई नवरोजी! ९२ वर्षाचे आयुर्मान लाभलेले दादाभाई सुमारे चाळीस वर्ष
विदेशात राहून देशाचे भवितव्य घडवू पाहत होते .ज्या काळात इंग्लिश लोकांनी चालवलेल्या शिक्षणसंस्थात विद्यार्थी म्हणून प्रवेश मिळवणे देखील अवघड होते,
त्याकाळात ‘गणित आणि तत्त्वज्ञान ,या विषयांचे अध्यापन करणारे पहिले भारतीय प्राध्यापक म्हणून दादाभाईंचे नाव घेतले जाते. दादाभाई नवरोजी हे १८५७ च्या
स्वातंत्र्यसमरापूर्वी एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून काम करीत होते.
त्याकाळी राज्यकर्ते इंग्लंडमध्ये राहत होते.कायदे पार्लमेंट करीत होते. राज्य कायद्याचे होते.राज्यकारभारात जनतेचा सहभाग नव्हता. त्यात स्वारस्य वाटण्याएवढी
समज लोकांना आली नव्हती. अशा स्थितीत आपण ब्रिटिश पार्लमेंटचे सभासद व्हावे, यासाठी निवडणूक लढवावी ,हा विचार दादाभाईंच्या मनात आला.
सन .१८९२ मध्ये दादाभाई इंग्लंडमधल्या एका मतदारसंघातून निवडून आले. तीन वर्षे राज्यकर्त्यांच्या दरबारात आणि राजधानीत हा तत्वज्ञानाचा प्राध्यापक
गणिती पद्धतीने आपले निष्कर्ष इंग्रजांच्या गळी उतरवीत होता.
दादाभाई हे पारशी समाजात जन्माला आले. तुलनेने सुविद्य आणि सुस्थितीत असा हा समाज होता. सचोटीने व्यवसाय करून दक्षतापूर्वक साहस करणारा ,
इंग्लिश शिक्षणाकडे सर्वप्रथम वळणारा,आधुनिकतेचा अंगीकार करून सधनतेची साधना करणारा, निर्व्यसनी, सज्जनांचा समुदाय, म्हणून हा समाज ओळखला जात असे.
दादाभाई १८५५–५६ च्या सुमारास लंडनमधील व्यवसायातील एक भागीदार म्हणून लंडनला गेले .तेथे त्यांचा ‘मँचेस्टर कॉटन सप्लाय असोसिएशन’,
‘कौन्सिल ऑफ लिव्हरपूल’, ‘अथेनियम’, ‘नॅशनल इंडियन असोसिएशन’ इ. संस्थांशी जवळचा संबंध आला. १८६५–६६ पर्यंत त्यांनी लंडनच्या
युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये गुजरातीचे प्राध्यापक म्हणून काम केले. १८६५–७६ या काळात व्यवसायानिमित्त दादाभाईंच्या इंग्लंडला अनेकदा वाऱ्या झाल्या.
१८६६ मध्ये त्यांनी लंडनमध्ये ‘ईस्ट इंडिया असोसिएशन’ या संस्थेची स्थापना केली .
दादाभाईंची १८७४ मध्ये बडोदे संस्थानचे दिवाण म्हणून नियुक्ती झाली. तथापि एका वर्षातच महाराज आणि रेसिडेंट यांच्याशी उद्भवलेल्या मतभेदांमुळे त्यांनी
दिवाणपदाचा राजीनामा दिला. जुलै १८७५ मध्ये ते मुंबई नगरपालिकेचे सभासद म्हणून व नगरपालिकेच्या शहरपरिषदेवरही निवडून आले. दादाभाईंनी
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या संस्थापनेत महत्त्वाचा वाटा उचलला. काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा बहुमान त्यांना तीन वेळा (१८८६, १८९३, १९०६) लाभला.
१९०२ साली दादाभाई लंडनच्या हाउस ऑफ कॉमन्समध्ये ब्रिटिश संसदेचे सदस्यत्व मिळविणारे आणि भारताच्या स्वातंत्र्यास्तव संसदेमध्ये आवाज उठविणारे दादाभाई हे पहिले भारतीय होत.
१९०६ च्या कलकत्ता काँग्रेसमध्ये भारताच्या समस्यांवर ‘स्वराज्य’ हा एकमेव उपाय असल्याचे त्यांनी घोषित केले होते.
परदेशी प्रवासाचा दादाभाईंच्या व्यक्तीमत्त्वावर व चारित्र्यावर सखोल परिणाम झाला. स्वतः उदारमतवादी पश्चिमी शिक्षण घेतल्यामुळे, दादाभाईंना त्या
शिक्षणपद्धतीबद्दल आदर होता. ब्रिटिशांनी पाश्चिमात्य शिक्षणपद्धती भारतात आणून तिचा प्रसार केल्याबद्दल भारताने नेहमीच इंग्लंडशी कृतज्ञ राहिले पाहिजे,
अशी दादाभाईंची भावना होती. आपल्या खाजगी जीवनामध्ये दादाभाईंचे वर्तन साधे परंतु भारदस्त होते.
एक समाजसुधारक म्हणून दादाभाईंचा लौकिक होता. जातिनिष्ठ मर्यादा पाळणे त्यांना मान्य नव्हते. स्त्रीपुरुष-समानता, स्त्रीशिक्षण यांचा त्यांनी सतत पुरस्कार केला.
त्यांनी मुलींसाठी तीन मराठी व चार गुजराती शाळा उघडल्या. दादाभाईंच्या ह्या समाजकार्याला जगन्नाथ शंकरशेट यांसारख्यांनी मोठा हातभार लावला.
दादाभाई नवरोजी हे भारतीय राज्याशास्त्र आणि अर्थशास्त्र यांचे जनकच मानले जातात. परकीयांच्या वर्चस्वाखालील भारतातील आर्थिक घटनांच्या विशदीकरणाची
किती नितांत आवश्यकता आहे, ते दादाभाईंनी आपल्यानंतरच्या अर्थशास्त्रज्ञांना दाखवून दिले.
पश्चिमात्य शिक्षण, जगप्रवास, विलायतेतील वास्तव्य, वर्षानुवर्षे केलेला यज्ञ, देशबांधवांच्या वतीने, आणि निर्भयतेने केलेले मार्गदर्शन, सामाजिक संस्थांची बांधणी
आणि उभारणी या साऱ्या त्यांच्या गुणसंपदाकडे पाहून इतिहासाने नतमस्तक व्हावे आणि दिव्यत्वाची जेथे प्रचिती असे म्हणत कर जोडावेत असे हे विलक्षण जीवन शिल्प होते.
अशा या विलक्षण जीवनशिल्पाला जन्मदिनानिमीत्त विनम्र अभिवादन
1 Comment